काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी कानपूर येथे भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या गाड्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वामी यांच्या गाडीवर अंडी, टोमॅटो आणि शाई फेकली. यावेळी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीमारात आंदोलकांना किरकोळ दुखापत झाली. सुब्रह्मण्यम स्वामी आज नवाबगंज येथील व्हीव्हीएसडी महाविद्यालयात एका परिसंवादात उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. दरम्यान कंपनी बाग चौकात पोचल्यानंतर त्यांच्या मोटारीवर काही आंदोलकांनी अंडे आणि टोमॅटो फेकले. याबाबत माहिती देताना त्यांच्या चालकाने सांगितले, “ते जखमी झालेले नाहीत. पण आंदोलकांनी मोटारीवर अंडे आणि टोमॅटो फेकले.‘ त्यानंतर आंदोलकांनी गाडीला घेराव घातल्याचेही चालकाने सांगितले.