पश्चिम बंगालच्या भाजप खासदार रूपा गांगुली यांना लहान मुलांच्या तस्करी प्रकरणी सीआयडीनं नोटीस पाठवली आहे. चाईल्ड ट्रॅफिकिंगच्या रॅकेटमध्ये चंदना चक्रवर्तीला अटक करण्यात आली, ज्यानंतर झालेल्या चौकशीत चंदनानं या सगळ्या प्रकारात रूपा गांगुली यांचा हात असल्याचा आरोप केला होता. ज्यानंतर आता सीआयडीनं या लहान मुलांच्या कथित तस्करीप्रकरणी रूपा गांगुलींना नोटीस पाठवली आहे. मुख्य आरोपी चंदनाला पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात अटक केली. भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांचही नाव या तस्करी प्रकरणात समोर आलं होतं. 'बिमला शिशू गृह' या एनजीओची अध्यक्ष चंदना चक्रवर्तीला मुलं दत्तक घेतल्याचं भासवून विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर तिची कसून चौकशी केली गेली ज्यामध्ये तिनं कैलाश विजयवर्गीय आणि रूपा गांगुली यांचेही हात लहान मुलांच्या तस्करीत असल्याचा आरोप केला होता. भाजपच्या महिला मोर्चाच्या नेत्या जुही चौधरी यांनी आपलं राजकीय वजन वापरून चंदना चक्रवर्ती यांना एनजीओसाठी परवाना मिळवून दिल्याचा आरोपही होतो आहे. मात्र रूपा गांगुली आणि कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळले आहेत.तसंच याप्रकरणी काहीही बोलण्यास रूपा गांगुली यांनी नकार दिला आहे. जुही चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी रूपा गांगुली यांची भेट घेतली होती. तसंच चंदना चक्रवर्तीला लहान मुलांसाठीची एनजीओ चालवण्यात काहीही अडचणी येऊ नयेत म्हणून जुही चौधरी यांनी दिल्लीतही काही मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली होती असा दावा सीआयडीनं केला आहे. याबाबतचे पुरावे असल्याचंही सीआयडीनं स्पष्ट केलं आहे. एका छापादरम्यान आम्ही जुही चौधरीला पकडलं होतं ज्यानंतर तिला आणि तिच्या वडिलांना भाजपनं घरचा रस्ता दाखवला होता असंही सीआयडीनं म्हटलं आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी याप्रकरणी सगळं खापर तृणमूल काँग्रेसवर फोडलं आहे. तृणमूल काँग्रेसला भाजपची बदनामी करायची आहे म्हणून आमच्यावर असे आरोप केले जात आहेत असा दावा विजयवर्गीय यांनी केला आहे. तसंच चंदना नावाच्या कोणत्याही बाईला मी ओळखत नाही असंही त्यांनी म्हटलंय. जुही चौधरीला मी भेटलो आहे, मात्र तिचा नेमका कशाशी संबंध आहे हे मला ठाऊक नव्हतं? असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच माझ्यावर आणि रूपा गांगुली यांच्यावर झालेले सगळे आरोप खोटे आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पोलीस तृणमूलच्या म्हणण्याप्रमाणे वागत असतात. त्यामुळे आमच्या बदनामीचं षडयंत्र तृणमूलनं रचलं आहे असं विजयवर्गीय यांनी स्पष्ट केलं आहे.