गुजरातच्या अहमदाबाद मध्ये कडक सुरक्षा असलेल्या साबरमती कारागृहात कैद्यांनी फरार होण्यासाठी भुयार तयार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. जवळपास १८ फूट लांब आणि चार फूट रूंदीचे हे भुयार २००८ साली अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या मालिकेतील १४ आरोपींनी तयार केले आहे. मात्र, या भुयाराची माहिती लागल्यामुळे त्यांचे फरार होण्याचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.  
कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार, २००८ साली अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपींमधील काही सिविल इंजिनीयरसुध्दा होते आणि त्यांनी खाण्यासाठी देण्यात आलेल्या भाड्यांचा उपयोग करून भुयार तयार केले. खरंतर, त्यांना दररोज कारागृहाच्या गार्डनमध्ये तीन तासांसाठी काम करण्यासाठी पाठवले जाई आणि ते तिथून भुयार खोदण्याचं काम करत होते.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे २००८ च्या साखळी बॉम्बस्फोटात ५० लोक मारले गेले होते. कोणी सुरक्षा अधिकारी भुयार बनवण्याच्या कटात सहभागी होता का, या गोष्टीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणातील ५० आरोपी सध्या कारागृहात आहेत. त्यापैकी १४ जणांची ओळख पटली आहे. भुयार अर्ध्यापर्यंत खणण्यात आल्यानंतर कारागृह प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली आहे. या क्षणी कारागृहात जवळपास ३,७०० कैदी बंद आहेत. मात्र, कारागृहाची क्षमता फक्त २,८०० इतकीच आहे.