सरसंघचालक मोहन भागवत यांनी महिलांविषयी केलेल्या ‘विवेकशून्य’ विधानाबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. निदर्शकांनी सरसंघचालकांच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच त्यांची पोस्टर्स जाळली.
काही दिवसांपूर्वी सरसंघचालकांनी बलात्कार फक्त इंडियातच होतात, भारतात नाही असे विधान करीत खळबळ उडवून दिली होती. या घटनेला आठवडाही उलटत नाही तोच इंदोर येथे संघ स्वयंसेवकांसमोर बोलताना त्यांनी स्त्रियांनी घरचा उंबरठा ओलांडू नये, लग्न हा करार असून स्त्रियांनी केवळ घरच सांभाळावे, असे वक्तव्य केले. त्यामुळे देशभरात, विशेषत: महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
सरसंघचालकांचे विधान हे समतेच्या तत्त्वाला बाधक असून, असे विधान केल्याबद्दल त्यांनी देशाची तसेच महिलांचीही माफी मागितली पाहिजे, असे निदर्शनकर्त्यां काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.