परदेशात जाणारे भारतीय गोमांस खातात, असे वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी शनिवारी केले. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लालूंच्या या वक्तव्यामुळे अपेक्षेप्रमाणे वाद निर्माण झाला. त्यामुळे लालूंनी लगेचच सारवासारव करताना आपल्या वक्तव्यापासून घुमजाव केले.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोमांस सेवनाच्या मुद्द्याला जातीय स्वरूप देत आहेत. परदेशात जाणारे अनेक भारतीय लोक गोमांस खातात. त्यामध्ये हिंदुंचादेखील समावेश असल्याचे लालूप्रसाद यांनी म्हटले होते. मात्र, त्याचवेळी लोकांनी गोमांस खाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. लोकांनी मांस खाणे टाळले पाहिजे, कारण त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात, असे लालूंनी म्हटले होते.
दरम्यान, लालूप्रसाद यांनी हे वक्तव्य मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या गिरिराज सिंह यांनी दिला होता. त्यामुळे आणखी टीका होण्याची शक्यता लक्षात घेता लालूप्रसाद यांनी त्यांच्या मूळ वक्तव्यापासून फारकत घेतली. मी ज्या ‘बीफ’चा उल्लेख केला होता, त्यामध्ये गोमांस नव्हे तर इतर प्राण्यांच्या मांसाबद्दल मी बोललो होतो. त्यामुळे हिंदुंनी गोमांस खाऊ नये, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.