‘अच्छे दिन’ आणि ‘जागतिक महासत्ता’ बनण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारताचे विदारक सत्य समोर आले असून कुपोषित देशांच्या यादीत भारत पहिला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले आहे.
देशातील एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के म्हणजेच १९.४६ कोटी लोक रोज उपाशीपोटीच झोपत आहेत. या तुलनेत चीनमधील कुपोषितांची संख्या कमालीची घटली आहे. हा अहवाल राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी विभागाने दिला असून यामध्ये जागतिक अन्नसुरक्षेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
देशाचा आर्थिक विकास दर वाढला याचा अर्थ त्याचा फायदा गरिबांना होतो असे नाही. भारताने कृषी उत्पन्नात वाढ केली असली तरी याचा फायदा कुपोषण कमी होण्यात झाला नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
विकसनशील देशांमध्ये ग्रामीण भागात अनेक लोक अद्याप एक वेळ उपाशीच राहत आहेत. भारतामध्ये १९९०-९२ मध्ये एकूण लोकसंख्येपैकी ३६ टक्के लोक कुपोषित होते. भारताने प्रयत्न करूनही हा आकडा काही अंशीच खाली आली आहे.
 १९९०-९२ मध्ये जगात कुपोषितांची संख्या एक अब्ज होती. हा आकडा २०१३
मध्ये ७९.५ कोटींवर आला आहे. ही काहीशी दिलासा देणारी गोष्ट आहे.
दक्षिण आशियामध्येही पाच वर्षांखालील कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिकआहे. १९९०-९२ मध्ये ही संख्या ४९.० टक्के होती. ती २०१३ मध्ये ३० टक्क्यांवर आली असल्याचे यात म्हटले आहे.