अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश जगातील सर्वात मोठे लोकशाही देश आहेत. लोकशाही मूल्ये आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे हे दोन्ही देश एकमेकांशी सहकार्याचे धोरण अवलंबून भविष्यात मार्गक्रमणा करतील, ओबामांच्या फेरनिवडीमुळे त्यात अधिक दृढता येईल अशा शब्दांत भारताने बराक ओबामांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी व परराष्ट्र मंत्रालयाने ओबामांना अभिनंदनपर संदेश पाठवताना त्यांच्या फेरनिवडीमुळे भारताशी असलेले अमेरिकेचे संबंध अधिकाधिक दृढ होण्यास मदत होईल असे स्पष्ट केले.
दरम्यान, भारताने ओबामांचे तातडीने अभिनंदन केले असले तरी शेजारी राष्ट्र पाकिस्तानने मात्र थोडे आढेवेढे घेतच ओबामांचे अभिनंदन केले. ओबामांचा विजय निश्चित झाल्यानंतर तातडीने या देशाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यानंतर अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी थोडय़ा उशिराने का होईना पाकिस्तानतर्फे अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करताना ओबामांचे अभिनंदन केले. दहशतवादविरोधी लढाईसंदर्भात अमेरिका आणि पाकिस्तान यांचा दृष्टिकोन समान असून यापुढेही तो कायम असेल असे झरदारी यांनी ओबामांना पाठवलेल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.

ओबामांच्या फेरनिवडीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिकाधिक दृढ होतील. त्यांचे अभिनंदन. मनमोहन सिंग