सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणबाबत केलेल्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे आणि सरसंघचालकांच्या मताशी ते सहमत आहेत की नाहीत ते स्पष्ट करावे, असे राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
आरक्षणाच्या धोरणाबाबत आपण गप्प का, भागवत यांच्या विधानाशी सहमती असल्यास मोदी यांनी तसे जाहीर करावे अन्यथा त्यांना फटकारावे, असे लालूप्रसाद यादव यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.हिंदूही गोमांस सेवन करतात या वक्तव्यावरून रालोआने लालूप्रसाद यांच्यावर टीका केली असल्याने लालूप्रसाद यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि मोदी यांना बचावाचा पवित्रा घेण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.

‘..तर मग सिद्ध करा’
‘सैतान’ अशी शेरेबाजी केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध करावे, अन्यथा आपल्यावर निशाणा साधून बिहारच्या जनतेचा अवमान केल्याबद्दल त्यांची माफी मागावी, अशी मागणी राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. मुंगेर आणि बेगुसराई येथील सभेत मोदी यांनी लालूप्रसाद यांच्या सैतान वक्तव्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना लालूप्रसाद म्हणाले की, मोदी आणि माध्यमातील त्यांच्या चाहत्यांनी आपण सैतान असे वक्तव्य केल्याचे दाखवून द्यावे, असे लालू म्हणाले.