पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी काश्मीरप्रश्नी पाकिस्तानचे मोठे नुकसान केले, अन्यथा त्यांनी १९९९ मध्ये लोकनियुक्त सरकारविरोधात बंड केले नसते तर हा प्रश्न आतापर्यंत सुटला असता, असे पाकिस्तानचे माहिती मंत्री परवेझ रशीद यांनी म्हटले आहे.
मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर बंड केले, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लाहोर चर्चेनंतर काही महिन्यांनी झालेल्या कारगिल युद्धामागेही त्यांचेच कारस्थान होते, असे सांगून ते म्हणाले की, हुकूमशहा मुशर्रफ यांनी काश्मीरप्रश्नी फार नुकसान केले. मुशर्रफ यांनी लोकशाही सरकारविरोधात बंड केले नसते तर काश्मीर प्रश्न हा आतापर्यंत सुटला असता; शिवाय पाकिस्तानपुढे ऊर्जेचे संकटही उभे राहिले नसते, दहशतवादही राहिला नसता. मुशर्रफ यांनी आयएसआय या गुप्तचर संस्थेशी मेतकूट जमवून राजकीय पक्ष काढला, तो पक्ष म्हणजे अबपारा (आयएसआयच्या मुख्यालयाशी संदर्भ) असे त्यांनी सांगितले. काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यवर्ती ठिकाणी आहे. रशियात उफा येथे पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेच्यावेळी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्याबाबत चर्चा केली.