संसद हल्ला प्रकरणातील एक आरोपी अफजल गुरू याला फाशी देण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना फारसा रुचलेला नाही. अफजलला फाशी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी एका  वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर असहमती आणि संताप व्यक्त केला.
अफजलला फाशी दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या निर्णयामुळे काश्मीरच्या खोऱ्यातील तरुणांमध्ये अन्यायाची आणि वेगळे पडल्याची भावना निर्माण होईल. अफजलला एवढय़ा वर्षांनंतर फाशी दिल्याने या कालावधीत काश्मीरमध्ये एक नवीन पिढी निर्माण झाली असून, आपल्याला न्याय मिळत नाही, अशी भावना या पिढीतील तरुणांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे, माझ्याकडे या तरुणांच्या प्रश्नांना उत्तरे नाहीत, अशा शब्दांत ओमर यांनी संताप व्यक्त केला. अफजलला फाशी देण्यात येणार आहे, याची माहिती त्याच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवणे आणि त्यांना त्याची अखेरची भेट घेऊ न देणे या गोष्टीही क्लेशकारक होत्या, असे ते म्हणाले. फाशीच्या शिक्षेच्या तरतुदीवरही त्यांनी टीका केली.
 दरम्यान, अफझल गुरूच्या फाशीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पुकारलेली संचारबंदी रविवारीही कायम होती. खोऱ्यात काही ठिकाणी सुरक्षा दलांचे कर्मचारी आणि निदर्शकांमध्ये चकमकी झाल्या. त्यात दोन निदर्शक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अग्रलेख : फाशीनंतरचा फास
सरबजीतबाबत दमाने घ्या :  मलिक
इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने सरबजीत सिंगच्या फाशीबाबत सबुरीने निर्णय घ्यावा, असे मत जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ)चे प्रमुख यासिन मलिकने व्यक्त केले आहे.
‘फाशीची तरतूद रद्द करावी’
न्यू यॉर्क/लंडन : अफजल गुरूला नेमकी आत्ताच फाशी का दिली, हा प्रश्न भारत सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. अतिगंभीर गुन्हे घडविणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ नये, असे कोणी म्हणणार नाही, मात्र फाशीची शिक्षा खूपच क्रूर आहे, भारताने या शिक्षेची तरतूद रद्द करून सर्वोच्च शिक्षा म्हणून जन्मठेप देण्याची गरज आहे, असे मत न्यू यॉर्क येथील ‘ह्य़ूमन राइट्स वॉच’ या संस्थेच्या दक्षिण आशियाच्या संचालिका मीनाक्षी गांगुली यांनी व्यक्त केले. तर अफजल गुरूला फासावर लटकावल्याच्या घटनेचा लंडनमधील अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे संचालक शशिकुमार वेलाथ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.