वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांचा कोलकाता दौरा ऐनवेळी रद्द करावा लागण्याचा प्रकार दुर्दैवी आहे, असे मत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनिता फाफ यांनी व्यक्त केले आहे. धार्मिक असहिष्णुता आणि अतिरेक अनावश्यक होता, असेही त्यांनी म्हटले आहे. सलमान रश्दी यांना कोलकाता भेटीवर येऊ न देण्याचा घडलेला प्रकार दुर्दैवी आहे, ते कोलकाता येथे आले असते तर त्यांचा दौरा कसा झाला असता तेच आपल्याला कळेनासे झाले आहे, असेही त्यांनी वार्ताहरांना सांगितले.
रश्दी यांनी दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईचा दौरा केला, तेथे कोणतीही समस्या उभी ठाकली नाही. रश्दी यांच्या ‘मिडनाइटस् चिल्ड्रन’ या कादंबरीवर आधारित एक चित्रपट तयार करण्यात आला असून, दिग्दर्शिका दीपा मेहता आणि अभिनेते राहुल बोस यांच्यासह त्या चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी रश्दी कोलकाता येथे येणार होते.
देशभरात आणि मुख्यत्वे पश्चिम बंगालमध्ये भूसंपादनाचा प्रश्न अत्यंत ज्वलंत बनला आहे त्याबाबत आपले मत काय, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, व्यापारी उद्देशासाठी भूसंपादन करावयाचे असल्यास सरकारने सर्व भागधारकांना त्यापूर्वी संबंधित कंपनीच्या मंडळावर घेण्याची गरज आहे.
रश्दी प्रकरणामुळे कोलकाताच्या प्रतिष्ठेला धक्का – महाश्वेता देवी
वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांना आवश्यक सुरक्षाव्यवस्था पुरवण्यास असमर्थ ठरलेल्या राज्य सरकारी यंत्रणेचा तीव्र शब्दांत निषेध करताना त्यांची या कारणास्तव रद्द झालेली शहरभेट हा कोलकाताच्या प्रतिष्ठेला बसलेला धक्का असल्याचे मत मॅगसेसे पुरस्कारविजेत्या बुजुर्ग लेखिका महाश्वेता देवी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.रश्दी यांची त्यांचीच पटकथा असलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बुधवारी शहरभेट ठरली होती, मात्र ती सुरक्षेच्या कारणास्तव रद्द झाल्याचे ऐकून खूप वाईट वाटले. वास्तविक राज्य सरकारने रश्दी यांचे स्वागत करून त्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची सुविधा व सुरक्षा उपलब्ध करून द्यायला हवी होती, ते दूरच राहिले. मात्र ज्या कारणामुळे ही भेट रद्द झाली त्यामुळे जागतिक स्तरावर या शहराची प्रतिष्ठा आणि संस्कृती या दोन गोष्टींना निश्चितपणे धक्का बसला आहे, असे एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाश्वेता देवी यांनी या वृत्तसंस्थेला सांगितले.