हिंदूंना दहशतवादी बनविण्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात, या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना नवे बळ मिळाल्याचे सोमवारी दिसून आले.
भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात असतो, या भारताच्या नेहमीच्या आरोपातील फोलपणा शिंदे यांच्या या विधानामुळे सिद्ध झाला आहे, अशी मखलाशी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हफिज सईद याने येथे एका पत्रकार परिषदेत केली.
भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात असतो, असा अपप्रचार भारताकडून नेहमीच केला जातो, मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या या विधानांमुळे या कारवायांमागे कोण आहे, हे उघड झाले आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानात होणाऱ्या बॉम्बस्फोटांसारख्या घटनांनाही भारतातील हिंदू संघटनाच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप त्याने या वेळी केला.
मुंबईवर चार वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी आम्ही जबाबदार असल्याचे टुमणे भारताने लावले आहे, मात्र या प्रकरणी आमच्यावर केलेले आरोप ते अद्याप सिद्ध करू शकले नाहीत, पाकिस्तान सरकारने आता पुढाकार घेऊन भारताला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे मागणी करावी, असे हास्यास्पद वक्तव्यही हफिजने केले.