खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ करू नये असं केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आज (गुरूवार) म्हणाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने उधळून लावण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या इशा-यावर भाष्य करताना शिंदे यांनी आपल्या शेजारील देशाला शक्य तेवढी कडक सुरक्षा प्रदान करणयाचा प्रयत्न करू, असे म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातीस संबंध सुधारण्यासाठी क्रिकेट हा एक चांगला दुवा ठरू शकतो, त्यामुळे खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ करू नये, असं शिंदे म्हणाले.
फक्त पाकिस्तानच नाही तर, जेव्हा इतर देशातील क्रिकेटर भारतात येतात तेव्हा त्यांना सुरक्षा पुरवणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही यावर चर्चा करू आणि शक्य तेवढी चांगली सुरक्षा पुरवण्याचा प्रयत्न करू. आम्ही याबाबतीत खूपच दक्ष राहणार आहोत, असंही ते पुढे म्हणाले.
पाकिस्तान संघाला सुरक्षा पुरवण्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं शिंदे म्हणाले. २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा क्रिकेटशी संबंध जोडू नये, असंही शिंदे म्हणाले.   
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोमवारी सर्व सजग हिंदू आणि देशभक्तांना भारत-पाकिस्तान क्रिकेटचे सामने उधळून लावण्याचे आवाहन केले होते. भूतकाळ विसरून जाण्याच्या शिंदे यांच्या वक्तव्याचाही ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून समाचार घेतला होता.