लेखक आशिष नंदी यांना अटक न करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.
आपल्याला अटक करू नये, या मागणीसाठी आशिष नंदी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. आपल्याविरुद्ध दाखल करण्यात गुन्हेदेखील मागे घ्यावेत, अशी विनंती नंदी यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली.
नंदी यांच्याविरोधात चार ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याचा माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांचे वकील गौरव कांत यांनी पत्रकारांना सांगितले. जयपूर, जोधपूर, नाशिक, रायपूरमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, त्यांची प्रत अद्याप आशिष नंदी यांना मिळालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आशिष नंदी यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये केलेले एक वक्तव्य वादग्रस्त असल्याचे काही संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांनी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.