प्रत्येक गोष्टीवर पंतप्रधानांनी भाष्य करण्याची गरज नाही, योग्य वेळी ते भाष्य करतील, असे केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन पाळले असल्याची टीका होत असल्याने सिंह यांनी वरील मत व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी बोललेच पाहिजे असा आग्रह का धरला जात आहे, प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणे उचित नाही, एखाद्या वाहिनीवरून सातत्याने एखादे वृत्त प्रसारित केले जात असल्यास त्याबाबत भाष्य करावयाचे की नाही हा पंतप्रधानांचा अधिकार आहे, योग्य वेळ येईल तेव्हा पंतप्रधान भाष्य करतील, असेही सिंह म्हणाले.
ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने माहितीच्या अधिकारांत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत, असे निदर्शनास आणून देण्यात  आले असता सिंह म्हणाले की, माहितीच्या अधिकारांबाबतचेही काही नियम आहेत, त्यानुसारच मंत्रालयाने उत्तरे देणे अपेक्षित आहे.
काही वाहिन्या गेल्या १५ दिवसांपासून ललित मोदी प्रकरण प्रसारित करीत आहेत आणि याचा बोलविता धनी वेगळाच आहे, असेही सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.