२६/११ च्या खटल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल अमीर कसाब याला देण्यात आलेल्या फाशीनंतर आता, २००१ मध्ये संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीचे काय असा सवाल, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारला केला आहे.
ट्विटर या संकेतस्थळावर गुजरातचे मुख्यमंत्री मोदी यांनी आपली भावना व्यक्त करताना हा प्रश्न उपस्थित केला आहे. कसाब याचे दहशतवादी कृत्य निंद्यच होते. मात्र त्यापूर्वी म्हणजे, २००१ मध्ये भारतीय लोकशाहीच्या पवित्र मंदिरावर अर्थात संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरू याला देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कधी करणार, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आहे. भारताच्या संसदेवरील हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार अफझल गुरू याला २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती. मात्र त्याच्या दयेच्या अर्जावरील निर्णय अजूनही प्रलंबित आहे.