तरुणांनी राजकारणात येऊन देशामध्ये बदल घडवला पाहिजे, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मंगळवारी व्यक्त केली. देशातील राजकारणाबद्दल तरुणांमध्ये निरुत्साह असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. 
छत्तीसगड सुरू असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्यव्यापी परिषदेमध्ये स्वराज यांनी युवकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाला, देशातील सध्याचे राजकारण बघून मी स्वतः खूप चिंतीत आहे. तरुणांचे नेतृत्त्व करणाऱया नेत्यांमुळे युवकांचा लोकशाहीवरील विश्वासच उडत चालले आहे. संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट असल्याचे तरुण नेतृत्त्वाचे म्हणणे आहे. मात्र, लोकशाही व्यवस्था लयाला गेली, तर हुकूमशाही राजवट येईल आणि तसे होऊ नये, याची मी त्यांना आठवण करू देऊ इच्छिते.
युवक लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकतात. त्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तरुणांना लोकशाही व्यवस्थेत व्यवस्थेत आणले पाहिजे. सध्या युवक फेसबुक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून एकत्र येतात. मात्र, त्यांच्यात नेतृत्त्वाचा अभाव आहे. असे सांगून त्या म्हणाल्या, युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगून निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित असलेले बदल घडवून आणले पाहिजेत.
भगवा रंग हा आपल्या संस्कृतीची ओळख आहे. त्याचा दहशतवादाशी संबंध जोडणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा अपमान करण्यासारखे आहे, या शब्दांत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हिंदू दहशतवादाबद्दलच्या वक्तव्याचा समाचार घेतला.