डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!

त्या दिवशी माझ्या वर्गातल्या एका मुलीला चक्कर आली. त्याचं काय झालं.. कॉलेजमध्ये लेक्चर चालू होतं. टीचर आम्हाला काही तरी दाखवत होत्या. आम्ही सर्व अर्धगोल करून उभे होतो. पंधरा मिनिटांनी धप्प असा आवाज आला. वळून बघितलं तर सोनाली भोवळ येऊन पडली होती. इतर मुली घाबरल्या जरा. कुणी तर म्हटलं.. बेशुद्ध पडली. मी लगेच खाली वाकून पल्स बघितली. बेशुद्ध नाहीय.. मी म्हटलं. (डॉक्टरची मुलगी असल्याचा फायदा – एवढंही नाही जमलं आणि सुचलं तर आयुष्य फुकटच बॉस!) पल्स कमी होती. तिला पाठीवर झोपवलं. पटकन टीचरला सांगितलं, साखर हवीय. त्या कुणाला तरी साखर आणायला पिटाळणार इतक्यात, चक्कएका मुलाकडे ‘सीसीडी’चे साखरेचे पाऊच सापडले. सोनालीच्या तोंडात साखर टाकली, पाणी दिलं. दहा मिनिटांनी ती सावरली, उठून बसली. आता बरी आहे.

आईला हे सगळं सविस्तर सांगितलं. तिने मला सोनालीला इलेक्ट्रॉल द्यायला सांगितलं. उन्हाळा सुरू झाला, की आईचे काही नवीन नियम चालू होतात घरात, सगळ्यांसाठी. नेहमीप्रमाणे मला कंटाळा यायचा या नियमांचा, पण आता सोनालीला अशी धाडकन पडलेली बघितली आणि मलाही जरा भीती वाटली. आईचे ते खाण्यापिण्याचे नियम योग्य असल्याची जाणीव झाली. नियमांबरोबर तिचं लेक्चरही असतंच. त्यातूनच मिळालेली ही जराशी माहिती.

मुंबईतला उन्हाळा, पुण्यातला उन्हाळा आणि मराठवाडा, विदर्भातला उन्हाळा हे वेगळे आहेत. मुंबईतल्या किनारपट्टीला घाम येतो, तर समुद्रापासून दूर घामबिम कुछ नही.. अंगाची लाहीलाही होते. दोन्हीत डिहायड्रेशनचा धोका असतोच. म्हणूनच आईचे हे नियम सुरू होतात. एप्रिल सुरू व्हायचा अवकाश, आमच्या नावाची प्रत्येकी दीड लिटरची बाटली घरात तैयार असते. ती बाटली आम्हाला दिवसातून दोनदा संपवावी लागते. मधूनमधून लिंबू सरबताची मज्जा तर न्यारीच असते. आजकाल बाजारात इतरही अनेक सरबतं मिळतात. रूहअफजा, िनबूज, कोकम सरबत, बार्ली यूस.. मस्त तहान भागते. घामामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता निर्माण होते. तीही सरबतं भरून काढतात. इतर साध्या सोप्या गोष्टी म्हणाजे ताक, मिल्कशेक इत्यादी पोटालाही छान आणि आम्हा तरुणांना चवीलाही छान! अर्थात रस्त्यावरची सरबतं पिणं वाईट, कारण कावीळ, टायफॉइडला आमंत्रण दिल्यासारखं होतं.

आपण तरुणमंडळी सतत घराबाहेर पडतो. ऊन-पाऊस काय फरक पडतो, असं म्हणतो. घरातून निघताना गॉगल, टोपी वापरत नाही. वेळेवर जेवत नाही. खूप वेळा नाश्ता न करता क्लासला जातो. मग कॉलेज, क्लासेस करत दुपारी अवेळी जेवतो. पाणी पित नाही. या सर्व गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो. कधी तरी आजार एकदम उग्र रूप धारण करून बरेच दिवस घरी बसावं लागतं मग. दुपारच्या उन्हात पूर्वी आपल्या आधीची पिढी भरपूर खेळायची, पण त्या वेळी पर्यावरणातील प्रदूषणाचा परिणाम आज जाणवतो तसा जाणवायचा नाही. आज आपल्याला झाडांची उणीव भासू लागली आहे. असो..

तर त्या दिवशी सोनालीला घरी सोडून मी घरी आले तेव्हा आईने भरलेली माझी दीड लिटरची बाटली दोनदा रिकामी झालेली होती. ती पुन्हा भरली. कलिंगडाच्या फोडीवर चाट मसाला टाकून त्या मटकावल्या. महाबळेश्वरहून मावशीने आणलेली स्ट्रॉबेरी स्क्वॉशची बाटली काढून ठेवली. संध्याकाळी आंब्याच्या फोडी केल्या आणि त्याबरोबर थोडा मिल्कशेकही (गरम पडू नये म्हणून.. आईची शिकवण!) तर.. हे होईपर्यंत आई आली. तिला आल्या आल्या ही सगळी उन्हाळ्याची तयारी सरप्राइज म्हणून दिली आणि खूप कौतुक आणि साखरेचे पापे मला मिळाले. उन्हाळ्यात ते फार चांगले.
थोडक्यात ताजं, पौष्टिक, स्वच्छ, गरमागरम अन्न सकाळ- दुपार खावं. उन्हातून घरी आल्यावर पूर्वी गूळ-खोबरं द्यायचे. ते का ते मला आता आठवत नाहीय. आईला पुन्हा विचारायला हवं उद्या.

हीटस्ट्रोक
हा खूप पटकन वापरला जाणारा शब्द असला तरी खूप सीरियस असू शकतो. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिणं महत्त्वाचं. शाळकरी मुलं आणि वयोवृद्ध यांना उष्णतेचा त्रास सगळ्यात जास्त होतो. तरुण मंडळी घराबाहेर जास्त असतात. त्यामुळे त्यांनाही हा उन्हाचा त्रास होऊ शकतो. काकडी, किलगड, पुदिना, कोिथबीर असे थंड पदार्थ वापरून वेगवेगळी समर कूलर्स बनवायच्या अनेक रेसिपीज आपल्याला नेटवर मिळतील. त्या नक्की करून बघायला हव्यात.