dwi18जागतिक मंदीमुळे चहुबाजूंनी आर्थिक संकटांनी घेरलेल्या, हलाखीचे दिवस कंठणाऱ्या, पण कणखरपणे स्वत:चे इमान जपत नशिबाशी दोन हात करणाऱ्या एका स्वाभिमानी लेखकाची हृद्य कहाणी..

२८ ऑक्टोबर १९२९ रोजी अमेरिकन कथाकार कॉनराड रिक्टर नेहमीप्रमाणे रात्री बातम्या ऐकत बसला होता. अचानक त्याने ती वार्ता ऐकली आणि त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. पण रेडिओ सांगतो आहे ते असत्य कसे असू शकेल? शिवाय, वाईट बातम्या या सत्यच असतात, हा त्याचा आजवरचा अनुभव होता. ही बातमी जितकी अनपेक्षित होती, तितकीच ती अतिशय भीषण होती. अमेरिकन शेअरबाजार एका दिवसात १३ टक्क्यांनी घसरला होता. असे आजवर कधीच झाल्याचे त्याला आठवत नव्हते. पण ही केवळ बातमी नव्हती; तर रिक्टरचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दोन्हींवर फार मोठा परिणाम करणारी ही घटना होती, हे त्याच्या ध्यानात आले होते. आणि म्हणूनच तो हादरला होता. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तो हिशेब करीत जागा होता. आणि त्या आकडय़ांनी त्याच्यासमोर जे चित्र उभे केले ते पाहून त्याला नंतर रात्रभर झोपच आली नाही. त्याची आजवरची सारी कमाई क्षणार्धात कापरासारखी उडून गेली होती आणि तो जवळजवळ निष्कांचन बनला होता. तो पुन: पुन्हा हिशेब करीत होता, पण उत्तर मात्र प्रत्येक वेळी एकच येत होते.. शून्य! काल त्याच्या गुंतवणुकीची किंमत द्द्र ३०,००० एवढी होती आणि आज तिचे मूल्य केवळ द्द्र १५,००० इतकेच उरले होते. आणि या शेअर्सच्या तारणावरच त्याने बँकेकडून सुमारे द्द्र १५,००० इतके कर्ज काढले होते. याचा अर्थ त्याचा खिसा पूर्णपणे रिकामा झाला होता. उद्या बँकेने कर्जापोटी हे शेअर जर विकायला काढले तर..? नुसत्या कल्पनेनेच त्याच्या मनाचा थरकाप उडाला. सकाळपर्यंत तो विचार करीत होता. आणि विचार करता करता त्याच्या नजरेसमोर आपल्या आजवरच्या ३९ वर्षांच्या आयुष्याचा लेखाजोखा उलगडत होता..
कॉनराड रिक्टरचे वडील धर्मगुरू होते आणि मुलानेही तो पेशा स्वीकारावा अशी त्यांची इच्छा होती. पण कॉनराडला धर्मगुरू मुळीच व्हायचे नव्हते. या पेशामुळे वडिलांना सदैव आर्थिक विवंचनांचा सामना करावा लागत होता, हे त्याने पाहिले होते. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला कॉलेज शिक्षण घेता आले नाही. तरुणपणीच त्याच्या मनात लेखक होण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. जगण्यासाठी त्याने अनेक कामे केली, अनेक व्यवसाय करून पाहिले, पण त्याचे मन कोठेच रमले नाही. सुदैवाने त्याने लिहिलेली दुसरीच कथा ‘Brothers Of No Kin’ ही अतिशय गाजली. तिला त्यावर्षीचा सर्वोत्तम कथेचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आता त्याने कथालेखनावरच सारे लक्ष केंद्रित केले. मात्र, यानंतर त्याला अपेक्षित असलेले यश मिळाले नाही. दरम्यान, त्याचे लग्न झाले. एक मुलगी झाली. पण कथालेखनातून मिळणारे उत्पन्न फार तुटपुंजे होते. त्यातच त्याच्या पत्नीला क्षयाची बाधा झाली. तिच्या औषधोपचारासाठी खूप पैसा लागू लागला. लेखनाला पूरक म्हणून त्याने स्वत:चा प्रकाशन व्यवसाय सुरू केला. १९२४ साली त्याचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि त्याचे उत्तम स्वागत झाले. मग मात्र गाडे थोडे रुळावर आल्यासारखे वाटू लागले.
अमेरिकेत त्याकाळी कथा प्रकाशित करणाऱ्या मासिकांचे दोन गट होते. बहुसंख्य मासिके लोकानुरंजन करणाऱ्या कथा छापत. रहस्यकथांना अथवा वेगवान ‘वेस्टर्न’ कथांना जास्त मागणी होती. अशा कथांमधील पात्रे ठरावीक पद्धतीने वागत, घटना ठरावीक पद्धतीच्या असत, योगायोगांची भरमार असे आणि वाचकांना हवा असलेला मेलोड्रामा त्यात ठासून भरलेला असे. गंभीर आशय असलेल्या, कलात्मक, दर्जेदार कथा छापणारी ‘Saturday Evening Post’सारखी मासिके अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी अल्प होती आणि तिथे स्पर्धाही खूप होती. त्यामुळे नाइलाजाने कॉनराडला चटपटीत, रंजक कथा लिहाव्या लागत. अशी तडजोड त्याला मुळीच पटत नसे; पण ती करण्यावाचून पर्याय नव्हता. कारण उदरनिर्वाहासाठी लागणारे पैसे मिळविण्याचे त्याचे लेखन हे एकमेव साधन होते. काही काळ दोन्ही प्रकारच्या कथांचा समन्वय करून लिहिण्याचा त्याने प्रयत्न केला, पण तो दोन्हीकडील संपादकांना रुचला नाही. या काळातील त्याची या प्रकारची एक कथा सात मासिकांनी नाकारली. साभार परत येणाऱ्या कथांचे प्रमाण वाढले. लेखन हे व्यवसाय म्हणून किती बेभरवशाचे आहे, हे त्याला चांगलेच कळले.
१९२७ च्या सुमारास त्याच्या पत्नीची- हार्वीनाची प्रकृती खूप ढासळली. डॉक्टरांनी तिला Sahara Lake या गावी क्षयाच्या खास इस्पितळात ठेवण्यास सांगितले. तिथे राहून प्रकाशन व्यवसाय चालू ठेवणे शक्य नव्हते, म्हणून नाइलाजाने रिक्टरने तो विकून टाकला. या व्यवहारात त्याला बरेच आर्थिक नुकसान झाले. पण ते सहन करणे भाग होते. त्याने आपले घरही विकले आणि पत्नीला व अकरा वर्षांच्या व्हीनाला घेऊन तो Sahara Lake येथे येऊन राहिला. सगळी मालमत्ता विकल्यानंतर त्याच्याजवळ सुमारे
द्द्र १८,००० उरले होते. बराचसा विचार करून त्याने ही रक्कम शेअर्स आणि बाँड्समध्ये गुंतविली. विकत घेतलेले शेअर्स बँकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज उचलले आणि त्या रकमेचे पुन्हा शेअर्स घेतले. बँकेच्या कर्जावरील ८ % व्याजापेक्षा शेअरमधील गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळेल अशी त्याची अपेक्षा होती. योजना अशी होती की, येणाऱ्या उत्पन्नातून घरखर्च निघावा आणि लेखनातून पत्नीच्या आजारपणाचा खर्च भागला जावा. मात्र, Sahara Lake चे वातावरण रिक्टरला आवडले नाही. इथल्यापेक्षा आल्बुकर्क येथे क्षयावर चांगले उपचार होतात आणि तेथील हवामानही अधिक चांगले आहे असे त्याने कुणाकडून तरी ऐकले व तो पत्नी आणि मुलीला घेऊन तेथे गेला. जाण्याच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या डायरीत लिहिले, ‘We  go tomorrow to New Maxico. I pray, we may have a little home, a little work and a little rest’
’ पण त्याचे हे लहानसे मागणेही नियतीला मंजूर नव्हते. थोडेफार स्थिरस्थावर होते आहे असे वाटत असतानाच आता हा शेअर बाजार कोसळला होता..
कॉनराड रिक्टर रात्रभर विचार करीत होता. एवढी आणीबाणीची परिस्थिती त्याच्यावर केव्हाच ओढवली नव्हती. आज त्याचे वय ३९ वर्षे होते. कुटुंबात आजारी पत्नी आणि लहान मुलगी होती. जवळ कसलीच मालमत्ता शिल्लक उरलेली नव्हती. शेअर्स बँकेत ठेवून त्यावर कर्ज घेतले होते, पण त्यांचे मूल्य निम्मे झाल्यामुळे जर उद्या ते बँकेने विकून टाकले तर तो कफल्लकच होणार होता. नियमित उत्पन्नाचे काहीही साधन हाती नव्हते. चारही बाजूंनी कोंडी झाल्यासारखे त्याला वाटू लागले. तशात आर्थिक मंदी सुरू झाल्यामुळे अनेक मासिकांनी लेखकांना द्यावयाचा मोबदला कमी केला होता.
तसा १९२८ सालीच मंदीने चोरपावलांनी अमेरिकेत प्रवेश केला होता. पण त्याची परिणती एवढी भीषण होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. सामान्य नागरिक तर सोडाच; पण मोठमोठे अर्थतज्ज्ञसुद्धा चकित झाले होते. १९२३ च्या जानेवारीपासून अमेरिकेत उत्पादन कमी कमी होण्यास सुरुवात झाली होती. ऑगस्ट १९२९ dwi20पर्यंत ते वीस टक्क्यांनी खाली आले. २८ ऑक्टोबर रोजी अचानक शेअर बाजाराचा निर्देशांक १३ टक्क्यांनी घसरला आणि मग मात्र सर्वत्र घबराट उडाली. दुसऱ्या दिवशी रिक्टर बँकेत गेला तेव्हा तेथे लोकांच्या रांगा लागल्याचे दृश्य त्याला दिसले. त्याच्यासारखे हजारो (आणि देशभरात लाखो) गुंतवणूकदार घाबरून या परिस्थितीतून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते. रिक्टरसमोर दोन पर्याय होते. पहिला : बँक ज्या किमतीला शेअर्स विकून टाकील ती मान्य करणे. दुसरा : घेतलेल्या कर्जावरील व्याज भरण्याची हमी बँकेला देणे आणि गुंतवणूक चालू ठेवणे. रिक्टरने दुसरा पर्याय निवडला. असंख्य लोकांप्रमाणे त्यालाही वाटत होते की, हे संकट तात्पुरते आहे, काही काळात पुन्हा बाजार वधारेल. पुन्हा आपल्या शेअर्सना भाव येईल. त्याने आपल्या विमा पॉलिसीज् गहाण ठेवून त्यावर कर्ज काढण्याचे ठरविले व तसा प्रस्ताव बँकेला दिला. बँकेने प्रथम तो नाकारला; पण रिक्टरची पत चांगली असल्यामुळे नंतर त्यांनी तो मान्य केला. या कर्जाची बरीच मोठी रक्कम तो शेअर्सवरील कर्जाचे व्याज फेडण्यात उपयोगात आणणार होता.
मात्र आता यापुढे उदरनिर्वाह कसा चालविणार? पत्नीची शुश्रूषा, मुलीचे शिक्षण यासाठी पैसे कोठून आणणार? इतर सर्व मार्ग खुंटले होते. आणि आपले कुटुंबीय आणि मित्र यांच्याकडे मदतीची याचना करणे, एवढाच एक मार्ग त्याच्यासमोर शिल्लक उरला होता. त्याच्यासारख्या स्वाभिमानी माणसाला अशी याचना करणे अत्यंत अपमानास्पद वाटत होते; पण दुसरा पर्यायच नव्हता. त्या दिवशी घरी आल्यावर रिक्टरने आपले वडील, दोन भाऊ, मेव्हणा आणि एक मित्र यांना पत्रे लिहिली. आजच्या या संकटासाठी तो परिस्थितीपेक्षा स्वत:लाच जास्त दोषी समजत होता. सारे पैसे शेअर्समध्ये गुंतविण्याचा निर्णय त्यानेच तर घेतला होता! सारासार विचार न करता आपण हा जुगार खेळलो, ही भावना त्याच्या मनाला खूप लागून राहिली होती. प्रत्येकाला लिहिलेल्या पत्रात पुन्हा पुन्हा तेच मांडताना त्याच्या मनाला असंख्य यातना होत होत्या. या साऱ्यांनी तातडीने आपल्या परीने रिक्टरला जेवढी शक्य असेल तेवढी मदत केली. काही काळ जगण्यापुरते पैसे त्याच्याजवळ जमा झाले. पण त्याचवेळी आणखीन एक संकट त्याच्यासमोर येऊन उभे ठाकले.
हार्वीनाची प्रकृती इतकी खालावली, की तिचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांना तीन वेळा तिचे ऑपरेशन करावे लागले. अनपेक्षित असा खूप मोठा खर्च करावा लागला. एक आठवडाभर ती मृत्यूशी झुंज देत होती. ती यातून आता वाचेल असे रिक्टरलाच काय, पण डॉक्टरांनाही वाटत नव्हते. मात्र, जबरदस्त इच्छाशक्तीमुळे ती वाचली. पुढे यासंदर्भात बोलताना ती एकदा म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीला अशा संकटात सोडून मी कशी जाऊ शकले असते?’
आतापर्यंतचे या कुटुंबाचे आयुष्य काही अगदी सुखात गेलेले नव्हते; पण आता मात्र पदोपदी वेगवेगळे काटकसरीचे मार्ग शोधून काढत जगणे त्यांना भाग पडले. त्यांनी पैसे वाचविण्यासाठी पहिल्यापेक्षा लहान घर भाडय़ाने घेतले. बायको आजारी असल्यामुळे तिची शुश्रूषा आणि घरकाम यातच रिक्टरचा सगळा दिवस जात असे. कामासाठी नोकर वगैरे ठेवण्याची कल्पनाही त्याला करता येत नव्हती. लेखनासाठी पूर्वीइतका वेळ देणे त्याला जमेना. परंतु लिहिणे तर अत्यावश्यकच होते. रात्री खूप उशिरापर्यंत बसून तो लिहीत असे. या काळात रिक्टरने ठरविले : ऐंशी टक्के लेखन असेच करायचे- जे विकले जाईल. त्याचा दर्जा, गुणवत्ता वगैरे काही पाहावयाचे नाही. ‘मागणी तसा पुरवठा’ हे ध्येय समोर ठेवायचे. हे ठरवणे सोपे होते, प्रत्यक्षात आणणे मात्र अत्यंत अवघड होते. दिवसामागून दिवस जे आपल्याला मुळीच करावयाचे नाही ते करीत राहताना रिक्टर शरीराने व मनाने थकून जात असे. आपण पैशांसाठी लिहितो आहोत, ही गोष्ट त्याच्या कलावंत मनाला क्लेश देणारी होती. या सुमारास त्याने एकदा डायरीत लिहिले, ‘I am like a ship that is slowly but steadily being sunk. I seem drunk with the sense of tragedy and defeat.’
एकीकडे लेखनासाठी वेळ कमी पडत होता आणि दुसरीकडे लिहिलेल्या कथांना विकत घेणारी मासिके कमी होत चालली होती. फेब्रुवारी १९३० पर्यंत रिक्टरने आठ कथा लिहिल्या आणि आपल्या एजंटला पाठविल्या होत्या. मार्चपर्यंत त्याची एकही कथा विकली गेली नाही. घरात फक्त काही पेन्स शिल्लक राहिल्या होत्या. या काळातील एक आठवण रिक्टरने २३ जून १९३० च्या डायरीत नोंदून ठेवली आहे. जुने कागद चाळताना त्याला अचानक एका बँकेचे पासबुक सापडले. त्यात एक डॉलर बारा पेन्स रक्कम शिल्लक होती. रिक्टरला जणू घबाड सापडल्याचा आनंद झाला. त्याने लगेचच बँकेतून एक डॉलर काढला आणि त्या रकमेतून एक मोठा ब्रेड, एक पौंड बटर आणि बारा अंडी विकत आणली. रिक्टरने लिहिलंय, ‘त्या रात्री जेवताना व्हीनीने आयुष्यात प्रथमच- बाबा, मला ब्रेडचा आणखीन एक तुकडा द्याल का, असे विचारले आणि माझ्या हृदयात कळ उठली.’
२६ जूनला त्याने लिहिलंय- ‘कितीतरी दिवसांत घरी मांस आणलेले नाही.’
१८ जुलैची नोंद अशी- ‘मी खूप थकलो आहे.’
१७ सप्टेंबरची नोंद- ‘हातात तेरा हस्तलिखिते आहेत, एकही स्वीकारले गेलेले नाही.’
३१ ऑक्टोबरची नोंद- ‘कोळसा, वीज, दूध.. कशासाठीच हातात पैसा नाही.’
या साऱ्या ताणांचा परिणाम रिक्टरच्या शरीरावर होणेही स्वाभाविक होते. त्याला अधूनमधून सारखा ताप येऊ लागला. पण आजारी पडून त्याला परवडण्यासारखे नव्हते. मात्र, आपले आजारपण वाढले तर काय होईल, ही आणखी एक काळजी त्याचं मन पोखरू लागली. सततच्या चिंतेतून काही काळ तरी सुटण्याचा एकच मार्ग त्याच्याजवळ होता. आठवडय़ातून दोन-तीनदा तो शहरापासून दूरवर जंगलात फिरायला जाई. आजूबाजूचे ते वसंतवैभव पाहताना त्याला साऱ्या विवंचनांचा विसर पडे. यासंदर्भात त्याने डायरीत नोंद केली आहे- ‘इतका सुंदर वसंत ऋतू मी कधीच पाहिला नाही.’
हार्वीनाची प्रकृती ढासळतच चालली होती. ती या आजारातून बरी होईल अशी आशा आता रिक्टरला वाटत नव्हती. तिला स्वत:लाही तसेच वाटू लागले होते. पाच वर्षांपूर्वी ते पाईन ट्री फार्मवर राहत. त्या ठिकाणी व्यतीत केलेले सुंदर, सुखाचे दिवस तिला आठवत. एकदा ती रिक्टरला म्हणाली, ‘पाईन ट्री फार्ममधील थोडीशी माती घेऊन ये. मी मेल्यानंतर माझ्या अंगाखाली व अंगावर ती माती थोडी थोडी पसरून दे.’
ऑक्टोबर १९३० मध्ये रिक्टरने गेल्या एक वर्षांचा हिशेब मांडला तेव्हा त्याच्या ध्यानात आले की, त्याच्या dwi21शेअर्सचे मूल्य तर वाढले नव्हतेच, उलट त्याचे कर्ज द्द्र २५०० इतके फुगले होते आणि बचत खात्यात फक्त द्द्र २० एवढीच रक्कम शिल्लक होती. पुन्हा एकदा मित्र व नातलगांकडून पैसे उधार मागण्याशिवाय पर्याय नव्हता. पुन्हा एकदा तोच जीवघेणा मन:स्ताप! पण त्याच्या जवळच्यांनी आताही त्याला साथ दिली. चारजणांनी मिळून त्याला द्द्र २००० उसने दिले. (रिक्टरने मात्र या रकमेची कर्ज म्हणूनच नोंद केली आणि ते व्याजासह फेडायचे आहे, असेही नोंदवून ठेवले.) या रकमेतून त्याने बँकेचे कर्ज कमी केले. अशा आर्थिक कसरतींत तो इतका गुंतला होता, की पुढे काय करावे, हेच त्याला सुचेना. या सापळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याने अनेकांना पत्रे लिहून विचारला. त्यापैकी एक पत्र तर अतिशय हृदयस्पर्शी आहे. त्याने लिहिले होते.. ‘गेल्या एक वर्षांपासून आयुष्य म्हणजे एक जिवंतपणीचा नरक बनले आहे. मला माझ्या पत्नीची शुश्रूषा करावी लागते आहे याबद्दल माझी तक्रार नाही. ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण ही चिंता, ही भीती आणि आपल्या चुकांबद्दलची खंत माझे मन पोखरते आहे. आज जेव्हा मी बँकेतून घरी आलो तेव्हा मला दिसले की, हार्वीना गुडघे टेकवून परमेश्वराची प्रार्थना करीत होती. तिला वाटते आहे की, माझ्या त्रासाचे सर्वात मोठे कारण तीच आहे. आम्हा दोघांनाही स्वत:च्या त्रासाबद्दल दु:ख नाही; इतरांच्या त्रासाचे आम्ही कारण बनतो आहोत, याचे दु:ख आहे..
मला मार्गदर्शन करण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे असे मला मुळीच सुचवायचे नाही. पण कधी कधी आपली शक्ती संपते, आपण स्वत:ला असहाय समजू लागतो. अशावेळी आंधळेपणाने आपण एखाद्या सशक्त हाताचा आधार शोधू लागतो. आजच्याएवढी मित्राची व मार्गदर्शकाची गरज मला कधीच भासली नव्हती.’
या सुमाराची त्याच्या डायरीतील ही नोंद : ‘मी बाहेर फिरावयास जातो आणि मला आश्चर्य वाटते की, आकाशात सूर्य तळपतो आहे, मी अजून जमिनीवर उभा आहे. मी चालू शकतो. निदान एवढे तरी मी करू शकतो.’
१९३० सालचा ख्रिसमस आला, पण तो गतवर्षीच्या ख्रिसमसपेक्षा वेगळा नव्हता. या वर्षी ख्रिसमस भेट म्हणून रिक्टरच्या वडिलांकडून आणि दोघा भावांकडून प्रत्येकी द्द्र ५० आले. रिक्टरने ते आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी म्हणून बाजूला ठेवले. वर्षांच्या शेवटी रिक्टरने हिशेब केला. या वर्षी लेखनातून त्याला द्द्र ३७०० मिळाले होते. (ही रक्कम त्याच्या रोजच्या खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी करणारी होती.) सार्वत्रिक मंदीचे परिणाम साहित्य व्यवहारावरही झाले होते. कथांची मागणी कमी झाली होती, कारण मासिकांना मिळणाऱ्या जाहिराती कमी झाल्या होत्या. ‘Saturday Evening Post’सारख्या मातब्बर मासिकाने आपली dwi24पृष्ठसंख्या २१० वरून १०२ वर आणली होती. पुढला काळही बेभरवशाचा होता. फक्त एकच गोष्ट काहीशी समाधान देणारी होती. हार्वीनाच्या प्रकृतीला असलेला धोका टळला होता आणि ती आता सुधारत होती.

हे समाधान मनात घेऊनच रिक्टर नव्या वर्षांला सामोरा गेला. वर्षांच्या सुरुवातीस रिक्टरने एक नवे वेळापत्रक स्वत:साठी आखून घेतले. सोमवार ते शुक्रवार एक कथा लिहावयाची, शनिवारी ती टाईप करायची व पाठवायची आणि रविवारी पूर्ण दिवस पत्नीसाठी व मुलीसाठी द्यायचा, घरकाम करायचे. चार कथांपैकी तीन कथा लोकप्रिय मासिकांसाठी लिहावयाच्या आणि एक दर्जेदार मासिकासाठी. गेल्या कित्येक वर्षांपासून तो नियमितपणे वेगवेगळ्या डायऱ्यांत सुचलेल्या, ऐकलेल्या कथाकल्पना लिहून ठेवीत होता. आता त्या त्याने पुन्हा चाळल्या. नव्याने त्यांच्यावर टिपणे तयार केली. आपल्या एजंटशी व प्रकाशकांशी नव्या जोमाने पत्रव्यवहार सुरू केला. यानंतर त्याने प्रापंचिक गरजांची एक यादी तयार केली. त्याच्याजवळ एकच सूट होता. तोही खूप जुना झाला होता. पण आणखी एखाद् वर्ष तरी नवा सूट घेणे शक्य नव्हते. त्याने तो विचार मागे टाकला. व्हीनासाठी कपडे शिवायचे होते. व्हीनाच्या आत्याने तिच्याजवळचे काही कपडे व्हीनाला दिले, ते कापून मुलीसाठी हार्वीनाने ड्रेस बनविले.
अमेरिकेतली आर्थिक मंदी (Great Depression) कमी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. उलट, अर्थव्यवस्था अधिकाधिक बिघडतच चालली होती. बँका बंद होऊ लागल्या होत्या. नवे रोजगार निघत नव्हते. जुने कारखाने बंद होत होते. शेतीमालाचे भाव घसरत चालले होते. असंख्य माणसे बेघर झाली होती. जगभर मंदीची लाट आली होती. जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील अनेक बँकांचे दिवाळे निघाले होते. रिक्टरसारख्याच अडचणीत आलेल्या अनेक लोकांनी दिवाळखोरीचा पर्याय निवडला होता. पण रिक्टरच्या मानी स्वभावाला ते पटणारे नव्हते. काय होईल ते होवो, तो सारे कर्ज निश्चित फेडणार होता. मात्र, दिवस वरचेवर अधिकच कठीण होत चालले होते. १४ मार्च १९३१ च्या डायरीत त्याने नोंद केली- ‘जगण्यापुरते तरी मी लेखनावर मिळवू शकेन असे वाटत नाही.’ त्याच्या मनात काही कादंबऱ्यांचे विषय घोळत होते. त्या कादंबऱ्या आपल्याला समाधान देतील आणि विकल्याही जातील अशी त्याची खात्री होती. पण त्यांच्यासाठी वेळ देणे शक्य होत नव्हते. कारण कादंबरी लिहावयाची म्हणजे कथालेखन बाजूला ठेवावे लागले असते. विकल्या जातील अशा कथा लिहिणे, ही पहिली आवश्यकता होती. परत परत आपण जे लिहीत आहोत त्याबद्दल त्याच्या मनात तीव्र असमाधान तयार होऊ लागले होते. मात्र, लोकप्रिय कथा लिहिल्यामुळे त्याचा एक फायदाही झाला. या कथा त्याच्या उत्तम शिक्षक बनल्या. पुढे चालून त्याने यासंदर्भात कबुली दिली आहे की, ‘या लोकप्रिय कथांच्या मदतीशिवाय मी दर्जेदार कथा लिहूच शकलो नसतो.’
१९३२ साल उजाडले, पण रिक्टरच्या (आणि अमेरिकेच्याही!) परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही. मार्च १९३२ मध्ये ईस्टर ईव्हच्या निमित्ताने रिक्टरला वाटले की, खूप दिवसांत आपण पत्नीसाठी फुले आणली नाहीत. म्हणून तो बाजारात फुले आणण्यासाठी गेला. पण जवळ फक्त एक डॉलर होता. आणि त्या रकमेत त्याला काहीच मिळाले नाही. परत आल्यावर त्याने जेव्हा हे आपल्या पत्नीला सांगितले तेव्हा ती म्हणाली, ‘त्यापेक्षा माझ्यासाठी थोडे बीफ आणले तर बरे होईल!’ असे लहान लहान प्रसंगही रिक्टरच्या मनाला फार लागत. रूढ अर्थाने रिक्टरची परमेश्वरावर श्रद्धा नव्हती. पण विश्वाच्या रचनेविषयी, या पसाऱ्याविषयी त्याला फार कुतूहल होते. विश्वाच्या रचनेचे काही नियम आहेत का, घडणाऱ्या घटनांची काही कारणमीमांसा लावता येते का, नियम असतील तर ते स्पष्ट का दिसत नाहीत, जे घडते आहे त्याची संगती विचार करणाऱ्या dwi22माणसालाही का लागत नाही, असे प्रश्न त्याला पडत. त्याने आपल्या परिस्थितीविषयी- ‘forgotten by God and man, or in disfavour of both…’ असे लिहून ठेवले आहे.
या काळात अमेरिकन जनतेच्या मनात खदखदत असलेला असंतोष सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने वर उफाळून आला. विद्यमान राष्ट्राध्यक्ष हूवर यांचा या निवडणुकीत जनतेने दणदणीत पराभव केला आणि रुझवेल्ट राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. कॉनराड रिक्टरनेही रुझवेल्ट यांनाच मत दिले. डेमोक्रॅटिक उमेदवाराला त्याने आयुष्यात दिलेले हे एकमेव मत होते. ‘रिपब्लिकन पक्षाची माणसे संपत्तीने ऑक्टोपससारखी सुजली आहेत,’ असे एका पत्रात त्याने लिहिले होते. याच पत्रात तो पुढे लिहितो, ‘मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवला, ही माझीच चूक झाली.’ रुझवेल्ट अध्यक्ष झाल्यावर त्यांनी आर्थिक मंदीच्या निवारणासाठी ठोस उपाय अमलात आणण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कार्यक्रमास ‘न्यू डील’ असे नाव दिले गेले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रमुखांना एकत्र आणून त्यांनी आपसातील स्पर्धा टाळावी यासाठी त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. मालाच्या किमान किमती, मजुरांचे किमान पगार ठरविले गेले. याचा परिणाम लगेच जरी दिसून आला नाही तरी अर्थव्यवस्था अधिक ढासळणे थांबले.
१९२९ ते १९३३ हा काळ अमेरिकेसाठी अत्यंत खडतर असा काळ ठरला. या काळात राष्ट्रीय उत्पादन ४५ टक्क्यांनी घटले. घरबांधणीचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाले. बेकारीचे प्रमाण ३ % वरून २५ % पर्यंत वाढले. जवळजवळ ११,००० बँका बंद झाल्या. ९० लक्ष बचत खाती बंद झाली. दहा लक्ष कुटुंबांना शेते विकावी लागली. २० लक्ष लोक बेघर झाले. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच बाहेरच्या देशांतून येणाऱ्या स्थलांतरितांपेक्षा बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली.
१९३२ च्या जानेवारीमध्ये रिक्टरने एक नवीन नोंदवही लिहावयास सुरुवात केली होती. या वहीच्या पहिल्या पानावर त्याने ठळकपणे ‘A Record Of Dreams, Signs, Etc. To Examine Later to See If Any Prove True…’ असे लिहून ठेवले होते. या वहीत तो आपली ‘स्वप्ने’ लिहून ठेवू लागला. पुढे अनेक वर्षे ही स्वप्ने कितपत पूर्ण झाली, याचा तो आढावा घ्यायचा, आणि नवीन स्वप्ने नोंदवायचा. मात्र, त्याच्या मनात भविष्याबद्दल एक अनामिक चिंताही निर्माण झाली होती. एकदा त्याने आपल्या डायरीत लिहिले, ‘एखाद्या गोष्टीची आशा मनात धरण्याचीही मला आजकाल भीती वाटू लागली आहे. वाटते की, माझे नशीब नेमके उलटे दान तर माझ्या पदरात टाकणार नाही ना?’
मासिकांनी कथा स्वीकारणेच फक्त कमी केले नव्हते, तर लेखकांना देण्याचा मोबदलाही त्यांनी कमी केला होता. त्याकाळी शब्दसंख्येवर मोबदला दिला जात असल्यामुळे रिक्टरने आता दीर्घकथा लिहिण्यावर लक्ष केंद्रित केले. निराशा वाढली की अधूनमधून तो स्वत:लाच धीर देत असे. २४ ऑक्टोबर १९३३ ची त्याच्या डायरीतील नोंद अशी : ‘I repeat I can write stories that sell. I think I can write stories that sell. I believe I can write stories that sell.’ ‘I believe’ असे तीन-तीनदा लिहून तो स्वत:लाच धीर देत होता. अशीच एक दीर्घकथा मनात घोळत असताना त्याला जाणवले की, हा काही वेगळाच विषय आहे. इतर कथा लिहीत असतानाच तो त्या दीर्घकथेसाठी वेगळा वेळ काढण्याचा प्रयत्न करू लागला. ही कथा त्याच्या शेजारच्या एका स्त्रीच्या अनुभवावर आधारित होती. लिहीत असतानाच हे लेखन आपल्या आजवरच्या लेखनापेक्षा वेगळे आणि चांगले ठरेल असा विश्वासही त्याच्या मनात निर्माण झाला आणि त्यामुळे त्याला अधिकच हुरूप आला. ‘या कथेचे नाव त्याने ‘Early Marriage’ असे ठेवले.
नुकतेच सतरावे वर्ष लागलेली नॅन्सी नावाची मुलगी आपल्या नियोजित पतीला भेटण्यासाठी सुमारे २०० मैलांचा खडतर आणि धोकादायक प्रवास कसा करते, याची ही वैशिष्टय़पूर्ण कहाणी होती. पश्चिम अमेरिकेतील १९ व्या शतकातील जनजीवनावर असंख्य वेस्टर्न कहाण्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांच्यात आता काही नावीन्य उरलेले नाही, हे रिक्टरला एव्हाना ठाऊक झाले होते. त्यामुळे या कथेच्या रचनेवर त्याने फार विचार केला. तिला त्याने अतिशय वेगळ्या रूपात सादर केले. पुढे आपल्या या प्रयत्नाविषयी त्याने लिहिले, ‘मी एक नवा point of view शोधून काढला. यापूर्वीच्या ‘western’ कथा बव्हंशी पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिल्या जात. त्याशिवाय त्यात आवश्यक तो राकटपणा येत नाही असे लेखकांना वाटे. मी प्रथमच या कथा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून लिहावयास सुरुवात केली. त्यामुळे आजवर जे विश्व वाचकाला ज्ञात होते, अतिपरिचयाचे झाले होते, त्याची अनोळखी बाजू त्यांच्या ध्यानात आली. यामुळे त्या कथा फक्त साहसकथा न बनता त्यांना मानवी भावनांचे अधिष्ठान मिळाले.’
१६ फेब्रुवारी १९३४ हा रिक्टरच्या आयुष्यातील एक संस्मरणीय दिवस होता. या दिवसाबद्दल त्याने आपल्या डायरीत सविस्तर लिहून ठेवले आहे. या दिवशी पहाटेच्या टपालाने रिक्टरने पाठविलेल्या तीन कथा परत आल्या. रिक्टर इतका उदास झाला, की दुपारभर त्याने काहीच लिहिले नाही. आपण पूर्णपणे अपयशी ठरलो dwi23आहोत, अशी कबुली त्याने पत्नीजवळ दिली. निराश होऊन तो टेबलाजवळ बसलेला असताना त्याला दारावरची घंटी ऐकू आली. त्याने उठून पाहिले- दारात पोस्टमन उभा होता आणि त्याच्या हातात तारेचा कागद होता. धडधडत्या हृदयाने त्याने ते पाकीट फोडले. त्याच्या एजंटने ती तार पाठविली होती आणि Saturday Evening Post ने त्याची ‘Early Marriage’ ही कथा स्वीकारल्याचे कळविले होते. रिक्टरच्या भावना अनावर झाल्या. त्याने लिहिले आहे, ‘माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माझ्यावर यापूर्वी कधीच एखाद्या गोष्टीचा एवढा परिणाम झाला नव्हता. भविष्य किती खडतर आहे, हे मला जणू कळून चुकले होते. पूर्वी जेव्हा माझी एखादी कथा विकली जायची तेव्हा मला वाटायचे, आपले कष्टाचे दिवस संपत आहेत. पण आता मला जाणवले की, कथेची स्वीकृती हा एक चमत्कार आहे. आणि तो पुन्हा पुन्हा घडणे अशक्य आहे. या जाणिवेने मला उदास बनविले. मग मात्र मला माझ्यासारख्या अनेक लेखकांची आठवण झाली- ज्यांना अशी तार यावयास हवी..’
रिक्टरला असे वाटणे स्वाभाविक होते. पण ही तार हा नियतीचा एक शुभसंकेत होता. येथून पुढे- वयाच्या ४५ व्या वर्षी त्याचे दिवस पालटण्यास सुरुवात झाली. यानंतर त्याचे ‘Post’शी घनिष्ठ नाते निर्माण झाले. इतके, की पुढली अनेक वर्षे त्याने जे जे साहित्य पाठविले ते ‘Post’ने स्वीकारले. १९३६ साली त्याचा ‘Early American’ हा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याचे फार चांगले स्वागत झाले.
‘The  Sun’च्या समीक्षकाने या कथांबद्दल लिहिले, ‘With material as familiar as yesterdayls news, he has written a collection of stories which have few equals in American literature.’
‘The Saturday Review of Literature’च्या समीक्षकाने लिहिले, ‘It is a work of beauty and of power.’
१९३७ साली त्याची ‘Sea Of Grass’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि
एक उत्तम कादंबरीकार अशी त्याची ओळख निर्माण झाली. येथून पुढे त्याच्या यशाची कमान उंचावतच गेली. यानंतर आपल्या या कहाणीच्या संदर्भात केवळ दोन महत्त्वाच्या नोंदी करणे उरले आहे. ‘Sea Of Grass’ या कादंबरीवर चित्रपट काढण्यासाठी टॅट या प्रख्यात कंपनीने रिक्टरला
द्द्र १५,००० दिले. ज्या दिवशी ही रक्कम रिक्टरच्या हातात पडली, त्या दिवशीच त्याने आपल्या साऱ्या देणेकऱ्यांचा हिशेब केला. कसलीही सवलत न घेता त्याने लोकांकडून घेतलेल्या सर्व रकमेची परतफेड केली. dwi26त्याच्या सासऱ्यांनी वाढदिवस किंवा सणाच्या निमित्ताने भेट म्हणून पाठविलेल्या रकमाही त्याने व्याजासह परत केल्या. त्याच्या वडिलांनी आणि भावांनी पाठविलेल्या रकमा आणि त्यावरचे व्याजदेखील त्यांची नाराजी पत्करून त्याने परत केले. एवढेच नव्हे तर त्याच्या बँकेने एकरकमी परतफेड केल्याबद्दल व्याजाच्या दरात सूट देऊ केली, तीदेखील त्याने घेतली नाही. त्याने ८ % व्याजाने कर्ज घेतले होते व त्याच दराने ते परत करण्याचा त्याने आग्रह धरला. खूप वर्षांनी रिक्टरने त्याच्या वडिलांच्या जीवनावर एक कादंबरी लिहिली आणि तिचे नाव ‘A Simple Honorable Man’ असे ठेवले. हे विशेषण त्यालादेखील तंतोतंत लागू होते.
रिक्टरचे नष्टचर्य संपले आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यासुमारासच अमेरिकेतली मंदीही संपुष्टात आली. १९३७ साली अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आली होती. १९४० साली अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. सैन्यात १७ दशलक्ष जवानांची भरती केली गेल्यामुळे बेकारी संपली. उत्पादन मोठय़ा प्रमाणावर वाढले आणि राष्ट्राची भरभराट होण्यास सुरुवात झाली.
१९४० साली आलेल्या रिक्टरच्या ‘The Trees’ या कादंबरीला सोसायटीज ऑफ लायब्ररीजचे सुवर्णपदक मिळाले. नंतर त्याने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या समीक्षकांनी नावाजल्या आणि त्या लोकप्रियही ठरल्या. ‘The Town’ला पुलित्झर पारितोषिक मिळाले, तर ‘Waters Of Kronos’ या कादंबरीला National Book Award मिळाले. या पुस्तकांनी रिक्टरला श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून नावलौकिक तर मिळवून दिलाच; पण आर्थिक स्थैर्यही दिले. पण ती पुढची गोष्ट आहे. लेखकाने मंदीशी दिलेल्या लढय़ाची कहाणी इथे संपली.