गेले काही दिवस सातत्याने अपघात होत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग यांपासून ते थेट अगदी साध्या गल्लीबोळापर्यंत अपघात होत आहेत. यामागील कारणे, अपघातामागील चुका, वाहतूक पोलिसांची भूमिका, स्त्यावरच्या नियमांचे काटेकोर पालन होणे असे अनेक मुद्दे यानिमित्ताने ऐरणीवर आले आहेत. भारतात आणि त्यातही विशेषत शहरी भागांत वाहतूकीचा, चालकांच्या मानसिकतेचा शास्त्रोक्त अभ्यास होणे गरजेचे आहे. असेच काही अभ्यासपूर्ण अहवाल आणि त्यातील निष्कर्ष इंटरनेटच्या माध्यमातून वाचनांत आले. त्यातील हे काही मुद्दे ..
उंचीवर बसलेल्या चालकांच्या तुलनेत कमी उंचीवर बसलेले चालक गाडी अधिक वेगाने चालवत असल्याचे भासते. त्यामुळे अधिक उंच वाहने चालविणारे चालक आपली वाहने जोराने हाकताना दिसतात.
 शहरी वाहतुकीतील एकूण वाहनांपैकी ७० टक्क्य़ांपर्यंत वाहनांचे चालक वाहनतळाच्या शोधात असतात.
 शहरी वाहतुकीपैकी किमान ८० टक्के वाहने ही त्या शहरांत उपलब्ध असणाऱ्या एकूण रस्त्यांपैकी केवळ १० टक्के रस्त्यावर धावत असतात.
 प्रचंड संख्येने वाहने असलेल्या शहरी रस्त्यावर रहाणाऱ्या लोकांना तुलनेने कमी मित्र असतात.
 आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये आठवडाभर ‘पीक अवर्स’ मध्ये असणाऱ्या वाहतुकीपेक्षा शनिवारी दुपारी १ वाजता जास्त वाहने रस्त्यावर असतात.
 आंतरराष्ट्रीय वाहतुकीबद्दल करण्यात आलेल्या सर्वेक्षणांनुसार एखादा रस्ता दुरुस्तीसाठी बंद केला असेल तर त्याच्या नजीक असणाऱ्या रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट होते.
 शहरातील रस्त्यांवर चालण्यापेक्षा सामान्यपणे माणसे ‘वाहनतळापासून’ आणि ‘वाहनतळाकडे’ चालणे अधिक पसंत करतात.
 सामान्यपणे ३० कि.मी. प्रती तास या वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांना प्रत्येक मिनीटास सरासरी १३२० माहितीचे तुकडे मिळतात.
 रस्ता ओलांडताना पादचारी फ़ार तर ३० सेकंदांची प्रतीक्षा करतात. मात्र त्यानंतर ते सिग्नलचे बंधन पाळत नाहीत.
 अभ्यासाअंती असे निदर्शनास आले आहे की बेफाम वेगाने वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघाताचा धोका तर वाढतोच पण त्या वेगाने त्यांनी सुमारे २७ मैल अंतर कापले तर सरासरी वेळेपेक्षा फक्त एक मिनिट कमी लागतो.
 चुकीच्या दिशेने रस्त्यावर उभे रहाण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकटय़ा अमेरिकेत वर्षभरांत ३५० जणांचा मृत्यू ओढवतो.
 जगभरातील शहरी भागात होणाऱ्या दर पाच वाहन अपघातांपैकी एक अपघात हा वाहनतळ शोधताना होतो.
 जुन्या वाहनांच्या तुलनेत नवीन वाहनांचा अपघात होण्याचे प्रमाण आणि शक्यता जास्त असतात.
 जगभरांत होणाऱ्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात हे स्वच्छ सूर्यप्रकाश असताना आणि वातावरण कोरडे असताना होतात.
 नियमबाह्य़पणे रस्ता ओलांडणाऱ्यांपेक्षा नियम पाळून रस्ता ओलांडणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण मोठय़ा शहरांमध्ये अधिक आहे.
 वाहनाच्या पुढील भागांत बसणाऱ्यांपेक्षा मागे बसणाऱ्यांना अपघाताचा धोका २६ टक्क्य़ांनी कमी असतो.
 शाळकरी विद्यार्थी आणि त्यांना सोडायला येणारे पालक यांच्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीच्या अडथळ्यांत १५ टक्क्य़ांनी वाढ होते.
 अमेरिकेतील वाहतुकीचा अभ्यास असे दर्शवितो की, तिथे होणाऱ्या अपघातांपैकी निम्मे अपघात ३५ कि.मी. प्रती तास या वेगापेक्षा कमी वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे होतात.
 पुरुष हे स्त्रियांच्या तुलनेत अधिक हॉर्न वाजवतात. तर स्त्रिया आणि पुरुष असे दोघेही, रस्त्यावर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना सावध करण्यासाठी, सर्वात जास्त वेळा हॉॅर्न वाजवतात.
 वाहन चालवताना मोबाइलवर बोलणारे चालक पाहिल्यास हॉर्नचा वापर अधिक आणि वारंवारतेने केला जातो.
 ‘वीक एंडस्’ना रस्त्यावर वाहने अधिक अशली तरी हॉर्न वाजविण्याचे प्रमाण कमी असते.
 रस्त्यावर चालणाऱ्या आपल्याच राज्यातील लोकांना सावध करण्यासाठी हॉर्न वाजविण्यापेक्षा परराज्यातील तसेच परराष्ट्रातील लोकांना सावध करण्यासाठी हॉर्नचा वापर अधिक केला जातो.
 चालक वाहन चालविताना दर साडेतीन सेकंदांपैकी केवळ ०.६ सेकंद इतका वेळ रस्त्याकडे बघत नाही. तर तासभरांत किमान ११ वेळा चालक वाहनात कशाची ना कशाची तरी शोधाशोध करतो.
 एखाद्या रस्त्यावरील स्टॉप सिग्नलचे प्रमाम जितके अधिक तितका त्या सिग्नलचा भंग होण्याची शक्यता अधिक
 हेल्मेट घालून सायकल चालविणाऱ्या सायकलस्वारांच्या जवळून कारचालक अधिकवेळा जातात तर, महिला दुचाकीस्वार असल्यास तिच्या वाहनापासून पुरेसे अंतर ठेवून वाहन चालविणे पसंत केले जाते.
 महामार्गावर ५५ कि.मी. प्रती तास या वेगाने जाणाऱ्या वाहनांची संख्या ८० किमी प्रतितास या वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या संख्येपेक्षा अधिक असते.