हल्लीची बहुतांश कुटुंबं ३-४ जणांचीच. त्यातही घरातले ‘कर्ते’ नवरा-बायको दोघेही दिवसभर कामानिमित्त बाहेर. मुलंही स्वत:च्या मित्रमंडळींमध्ये. मग घरातल्या वृद्धांचं काय?, त्यांचा एकाकीपणा कुणी लक्षात घेईल का?* प्रश्न- मी आणि माझे पती दोघेही मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकरी करतो. आम्हाला कॉलेजमध्ये जाणारा एक मुलगा आहे. माझ्या ७५ वर्षांच्या सासूबाई देखील आमच्याबरोबर राहतात. माझा प्रश्न सासूबाईंविषयी आहे. त्यांना अलिकडे फार एकटे- एकटे वाटते. आमच्या सोसायटीत सासूबाईंना गप्पा मारता येईल, असे कुणी आता उरलेले नाही. आम्हा नवरा-बायकोंना रोज घरी यायला ८ वाजतात, त्यामुळे त्यानंतर घरात फारशा गप्पा होत नाहीत. मुलगा त्याच्याच विश्वात असल्यामुळे तो जेवण आणि झोप एवढय़ापुरताच घरात असतो. दररोज अगदी रिक्षानेही बाहेर फिरायला जाणे सासूबाईंना सोसणारे नाही. म्हणून मी त्यांना टीव्ही पाहण्याचा किंवा नातेवाईकांना फोन करण्याचा सल्ला दिला, पण सारखे ते तरी किती करायचे असे त्यांचे म्हणणे असते. परवा त्यांनी चक्क ‘मला वृद्धाश्रमात नेऊन सोडा,’ अशी मागणी केली, तेव्हा मात्र आम्ही चरकलो. त्यांचा उदास चेहरा पाहून त्या भलतेच काही पाऊल उचलणार नाहीत ना याची काळजी वाटते. * उत्तर- पहिल्या अध्र्या प्रश्नाला पुढचा अर्धा भाग जोडणं आवश्यक आहे. जर वाटेत काही अघटित घडलं नाही, तर आपण सगळेच म्हातारे होणार आहोत. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो मोलाचा आहे. तुम्ही वेळेत मदत मागितली, हे अजून चांगलं आहे. सोपं उत्तर म्हणून असं सांगता येईल की तुम्ही ‘काटकोन त्रिकोण’ या नाटकाचा प्रयोग जरूर बघा. तुमच्या मनात त्यातून काय उमटतं, त्याच्या नोंदी ठेवा. आपण चर्चा करू. आपण किती वेळ आजींना देऊ शकतो यावर मर्यादा असल्या, अन् आजूबाजूला कुणी समवयस्क नसलं, तरी आहे त्या वेळात आपण काय करू शकतो, हे बघू या. तुम्हाला माहीत आहे की आमच्यासारख्या डॉक्टरांना खूप माहिती लागते. तुमच्या प्रश्नातून तर सगळी माहिती येणं शक्य नाही. म्हणून आज मी तुम्हाला बरेचसे प्रश्न देऊन ठेवतो. मी पण या प्रक्रियेतून तुमच्याबद्दल, तुमच्या कुटुंबातल्या नात्यांबद्दल, तुमच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षांबद्दल जरा जास्त शिकेन. हे प्रश्न असे : आपण एकत्र जेवायला बसतो का?, त्या दिवसातलं चांगलं- वाईट शेअर करतो का?, मागच्या चांगल्या-वाईट आंठवणींमधून चांगला अर्थ काढून समाधानाकडे प्रवास होईल, असं बघतो का?, आजींबरोबर त्यांच्या डॉक्टरांकडे जातो का?, त्यांच्या डॉक्टरांशी बोलतो का?, या सगळ्यात आपल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाचा स्वत:हून सहभाग असतो का?, आपण सुचवलं तर त्याचा यातला सहभाग वाढेल का?, या सगळ्या अनुभवातून जाताना आपला मुलगा जे पाहील त्याचा भविष्यात आपल्याशी किंवा त्याच्या सासू- सासऱ्यांशी वागताना कुठेतरी, थोडाफार तरी, कळत- नकळत परिणाम राहील का, यालाच संस्कार म्हणायचं का? आजींना टीव्ही पाहायला सांगण्यात आणि नातेवाईकांना फोन करायला सुचवण्यात ‘आपण’ कुठेच राहात नाही, असं आजींच्या मनात डोकांवून जात असेल का?, आपण फक्त अन्न-वस्त्र-निवारा पुरवतोय, पण भावनेने आपल्याला घरात आजी हवी आहे असं प्रतीत होतंय का?, त्यांना काय आवडतं, काय आवडत नाही हे आपण नोंदलंय की नाही? अन् आपण त्याची नोंद घेतलीय की नाही हे आजींच्या लक्षात आलं असेल असं आपल्याला वाटतं का?खूप जास्त काळजी वाटत असेल तर आधी मानसोपचारतज्ज्ञांना भेटून मग आपण चर्चा करू. म्हणजे वृद्धाश्रम, आत्महत्या अशा गोष्टींनी चरकून जायला नको. त्यांच्याविषयी पुन्हा केव्हातरी बोलू.