केळी आणि दुधाची शिकरण, दुधातील ‘फ्रूट सॅलड’, फळांची बासुंदी, मिल्कशेक, अननसाचे दह्य़ातले रायते..कितीतरी पदार्थ! सध्या थंडीमुळे बाजारात वेगवेगळी फळे मुबलक प्रमाणात मिळू लागल्याने अशा घराघरात अशा पदार्थाची नुसती रेलचेल असेल नाही! पण आयुर्वेदाच्या दृष्टीने दूध- दही आणि फळे यांचे वाकडेच आहे! या पदार्थाच्या संयोगाबद्दल आयुर्वेद काय म्हणतो ते पाहू या-* दूध किंवा दही आणि फळे एकत्र करुन बनवलेल्या पदार्थामुळे कफाचा प्रकोप होतो आणि सर्दी, सायनसचा त्रास, सूज, जडत्व, गुंगी येणे, अवेळी झोप येणे, अंगाला खाज सुटणे असे विकार उद्भवू शकतात. * या पदार्थामुळे अग्नी मंद होतो, पचनक्रियेचा वेग मंदावतो आणि पचनास उपयुक्त असलेले स्राव पुरेसे स्रावत नाहीत. त्यामुळे अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. * फळांमधली साखर चटकन पचते, पण त्याबरोबर असलेल्या दुधातली प्रथिने पचण्यास तुलनेने वेळ लागतो आणि फळे पोटात तिथेच पडून राहतात. त्यातील साखरेमुळे फसफसण्याची प्रक्रिया होते आणि त्यातून वायू तसेच आम्लधर्मी पदार्थ तयार होतात. त्यामुळे अन्न वर येणे, पोट फुगणे, पोट जड होणे, अॅसिडिटी असे त्रास होतात. * आंबटपणा असलेली फळे दुधात घातल्यास दूध नासून त्यापासून चिकट- श्लेष्मल पदार्थ (म्यूकस) तयार होतो व त्यामुळे पाचक स्रावांचा विनाश घडवला जातो. असे झाल्याने खाल्लेल्या पिष्टमय पदार्थाचे पचन होण्यासाठी पचनसंस्थेवर ताण निर्माण होतो आणि अपचनाची लक्षणे निर्माण होतात. * आतडय़ांमधील उपकारक जंतूंच्या वसाहतीलाही दूध किंवा दही आणि त्याबरोबर फळे असलेल्या पदार्थामुळे हानी पोहोचते. अर्थात प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि पचनशक्तीनुसार वरील त्रास कमी- अधिक प्रमाणात जाणवतात. तरीही असे पदार्थ शक्यतो टाळावेत. परंतु हे पदार्थ खाणे अपरिहार्य असल्यास पुढील घरगुती उपाययोजना त्रासांची तीव्रता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील.दूध किंवा दह्य़ाबरोबर फळे खायची तर.* अर्धा चमचा किसलेले आले आणि काळे मीठ हे जेवणाच्या अर्धा तास आधी खावे. * दूधयुक्त पदार्थामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड अवश्य घालावी. * जेवताना मध्ये-मध्ये सुंठयुक्त गरम पाणी घोट- घोटभर पीत राहावे. थंड पाणी आणि थंड पेये अगदीच टाळावीत. * जेवणातील पिष्टमय पदार्थ (म्हणजे पोळी, भाकरी, भात इ.) भरपूर चावून खावेत. अन्नाचा घास चावून खाल्ल्याने त्यात लाळ मिसळून त्यामुळे पिष्टमय पदार्थाचे पचन होण्यास मदत होईल. * काळे मिरे, दालचिनी आणि तमालपत्र समप्रमाणात घेऊन त्याची पूड करावी. ही पाव चमचा पूड जेवणानंतर घ्यावी. जरूर वाटल्यास पुन्हा १-२ तासांनी घ्यावी. डॉ. संजीवनी राजवाडे -dr.sanjeevani@gmail.com