कामाच्या सततच्या अति ताणाचे लगेच दिसणारे परिणाम ’कामाचा अति ताण असताना मेंदूलाही अति काम पडते, त्यालाही विश्रांती हवी असते. त्यामुळे एखादे काम सातत्याने आणि कोणताही ‘ब्रेक’ न घेता करत असाल तर चिडचिड, एकाग्रता कमी होणे व डोके दुखण्याची शक्यता असते. एकाग्रता कमी झाल्यामुळे कामात चुकाही होऊ लागतात. साधारणत: ५ ते ६ तास सलग काम केल्यावर डोके दुखायला लागते. त्याला ‘टेन्शन टाइप हेडेक’ असे म्हणतात. ’अति काम करताना डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांमधून पाणी येते आणि डोळे लाल होऊ शकतात. ’संगणकासमोर मान विशिष्ट कोनातच ठेवली जात असल्यामुळे मानेचे स्नायू दुखतात. ’एकाच ठिकाणी सारखे बसून राहिल्याने हातापायाचे स्नायूही कडक होतात. यामुळे स्नायू दुखी तर होतेच, पण सांधे कडक होणे, कंबरदुखी, खांदेदुखी हे त्रासदेखील सुरू होतात. पाय हलवले न गेल्याने ‘डीप व्हेन थ्राँबोसिस’! एसीत एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्यामुळे व पाय हलवलेच न गेल्यामुळे ‘डीप व्हेन थ्राँबॉसिस’ हा आजार होण्याची शक्यता असते. यात पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि पाय खूप दुखणे, एकाच पायावर सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. पायाच्या नसेत तयार झालेली गुठळी फुप्फुसात जाऊन अडकू शकते. अशा परिस्थितीत रुग्णाला दम लागण्याचे लक्षण दिसू शकते आणि प्रकृती गंभीर होण्याचीही शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठीही अधूनमधून पाय मोकळे करणे व पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. ‘एसी’त सातत्याने बसल्यामुळे ‘डीहायड्रेशन’! वातानुकूलन यंत्रणा खोलीतील हवेतली आद्र्रता कमी करते आणि खोलीत थंड व कोरडी हवा सोडते. तासन्तास ‘एसी’त बसल्यावर आपल्याही श्वासोच्छ्श्वासावाटे शरीरातील बाष्प तुलनेने अधिक प्रमाणात बाहेर पडत असते, त्वचेतील ओलावाही उडून जात असतो. उन्हात फिरल्यावर आपल्याला घसा कोरडा पडून जशी तहान लागते, तशी तहान एसीत लागत नाही. थंड वाऱ्यात बसल्यावर पाणी पिण्याची गरज नसते असा आपला समज असला तरी तो खरा नव्हे. याच कारणामुळे तासंतास एसीत बसणाऱ्यांना ‘डीहायड्रेशन’ होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे थोडय़ा- थोडय़ा वेळाने पाणी पीत राहणे गरजेचे. शरीरातील स्नायू ‘रिहायड्रेट’ झाले नाहीत तर स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात. ‘काँप्युटर आय सिंड्रोम’ प्रत्येकाच्या डोळ्यावर अश्रूंची पातळ ‘फिल्म’ (टिअर फिल्म) असते. या फिल्ममुळे डोळ्याचे कार्य नीट चालते. डोळ्यांची उघडझाप होताना ही फिल्म पुन:पुन्हा रीफ्रेश होत राहते. पण सातत्याने संगणक, आय-पॅड किंवा मोबाइलच्या स्क्रीनकडे पाहात राहिल्यास डोळ्यांची उघडझाप कमी होते आणि अश्रूंची फिल्म तयार न होऊन डोळा कोरडा पडतो. यामुळे डोळ्यात सारखा कचरा गेल्यासारखे वाटणे, खुपणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांची आग होणे, डोळे थकल्यासारखे वाटणे, चिडचिड व डोकेदुखी अशी लक्षणे उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी एक साधा उपाय आहे. प्रत्येक वेळी संगणकावरील ‘एंटर’ किंवा ‘स्पेस बार’चे बटन दाबताना मुद्दाम डोळ्यांची उघडझाप करण्याची सवय लावून घ्या. डोळ्यांवर ताण जाणवू लागताच काही काळ काम थांबवा आणि एखाद्-दोन मिनिटे डोळे मिटून त्यांना विश्रांती द्या. दीर्घकालीन परिणाम सतत अति काम आणि अति ताणाची जीवनशैली असलेल्या आणि शरीराला व्यायाम नसलेल्या व्यक्तींमध्ये वजन वाढणे, रक्तदाब वाढून आणि उच्च रक्तदाबाचा आजार संभवणे, ‘कोलेस्टेरॉल’ आणि ‘लिपिड प्रोफाइल’च्या पातळीवर नियंत्रण न राहिल्यामुळे हृदयविकार आणि अर्धागवायूचा झटका याकडे हळूहळू वाटचाल सुरू होऊ शकते. मधुमेही व्यक्तींना मधुमेहावर नियंत्रण न राहण्याची समस्या उद्भवू शकते, तसेच चुकीची जीवनशैली कायम राहिली तर मधुमेह नसणाऱ्यांचाही तो होण्याकडे कल निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा जीवनशैलीत छातीत दुखणे, थोडेसे चालल्यावर दम लागणे, एखादा जिना चढल्यानंतरही दम लागणे ही लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेतलेला बरा! हे करा! ’ कार्यालयात काम करताना किमान दर २ तासांनी छोटा ‘ब्रेक’ घेणे गरजेचे. या वेळात कार्यालयाच्या कॉरिडोरमध्ये चक्कर मारून या, पाय मोकळे करा आणि पुन्हा कामाला लागा. यामुळे पायातील रक्ताभिसरण योग्य रितीने होईल. ’ रोज व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. व्यायाम किमान ४० ते ५० मिनिटे आणि चालणे, जॉगिंग, धावणे असा कोणताही प्रकारचा चालू शकेल. ’ डेस्कवर बसल्या बसल्या मान व खांद्यांचे व्यायाम करता येतील. खांदे उडवण्याचा ‘श्रग’ नावाचा एक व्यायाम असतो- तो देखील करता येईल. ‘आयटी इंडस्ट्री’सारख्या कामात माणूस जो सकाळी ऑफिसमध्ये शिरतो तो संध्याकाळनंतरच बाहेर पडतो. यात सूर्यकिरण अंगावर पडतच नाहीत. त्यामुळे कोवळ्या उन्हात मिळणाऱ्या ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता अशा व्यक्तींमध्ये आढळते. परिणामी हाडे कमकुवत होतात. हाडे दुखणे, पाठ दुखणे ही लक्षणे अशा व्यक्तींमध्ये दिसतात. सकाळच्या वेळात मोकळ्या हवेत व्यायाम करताना कोवळे ऊनही मिळत असल्यामुळे असा व्यायाम गरजेचा. ’ सततच्या कार्यालयीन कामाचा ताण असणाऱ्यांनी कोणता आजार नसला तरीही प्रत्येक ६ महिन्यांनी डॉक्टरांकडून ‘रुटिन चेकअप’ करून घ्यावे. - डॉ. अभिजित देशपांडे drabhijitad@gmail.com (शब्दांकन- संपदा सोवनी)