मनोमनी काही तणाव असे असतात की ते कुठल्याही व्यक्तीला पेलवणे कठीण असतत. उदाहरण म्हणजे जीवनावर बेतलेले काही प्रसंग- अपघात, हल्ला किंवा एखाद्याच्या आत्मसन्मानावर आणि व्यक्तिमत्त्वावर झालेले आघात जसे बलात्कार, सामूहिक अपमान, सामाजिक बहिष्कार. अवतीभोवतीचे जग उद्ध्वस्त करणारी आपत्ती जसे भूकंप, अतिवृष्टी आणि युद्धही कारणीभूत ठरतात. ताणतणावाला तोंड देण्यासाठी आपल्या शरीरात सर्वात आधी एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात. जर तणाव जास्त वेळ टिकला तर कॉरटिसोल नावाचे द्रव्य दीर्घकाळासाठी निर्माण होते. अति, विचित्र आणि विशिष्ट प्रसंगात या द्रव्यामुळे शरीरातील आणि मेंदूतील बदल झपाटय़ाने आणि अतिरेकापर्यंत घडतात. मेंदूतील हिपोकँपस लहान होतो आणि त्यामुळे विशिष्ट मानसिक आजार होतात. पूर्वी आपत्तीनंतर शारीरिक आणि आíथक पुनर्वसनालाच जास्त महत्त्व दिले जात असे. मात्र मनावरच्या जखमांवर उपचार करणे तितकेच महत्त्वाचे असते, हे सर्वाच्या लक्षात आले आहे. २००४ च्या सुनामीनंतर हे सरकारी सहाय्य पथकात मानसोपचारही होते. लागलीच होणारे आजार तणावपूर्ण प्रसंग झाल्या झाल्या व्यक्तीच्या वागणुकीत बदल होतात. ते म्हणजे एकदम उत्तेजित किंवा मलूल होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे- तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक बघत राहणे. आपत्तीनंतर साहाय्यपथक तिथे पोचते तेव्हा ही परिस्थिती असते. ही स्थिती साधारण ४८ तास राहते. त्या वेळेला व्यक्तीला सुरक्षित, शांत ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींबरोबर (शक्य असेल तर) ठेवून त्याची काळजी घेतली जाते. त्याचे खाणेपिणे आणि लागतील तशी औषधे- उदाहरण- झोपेसाठी दिली जातात. ती व्यक्ती आपोआपच आपल्याशी बोलायला लागली की मगच समुपदेशन केले जाते. लवकर आधार दिल्यामुळे बहुतेक वेळेला हा आजार पूर्णपणे बरा होतो. लवकर सुरू होऊन दीर्घकाळ राहणारे आजार काही व्यक्ती तणावाच्या विषयातून बाहेरच येत नाहीत. त्यांच्या संवेदना बधिर होतात किंवा भित्रेपणा, उदासीनता, चीडचीड कायम राहते. भविष्याचे, साधारण कुठेतरी घराबाहेर फिरायला जाण्यापुरतेही नियोजन करणे जमेनासे होते. याचे कारण त्या व्यक्तीवरील तणाव. राहते घर- कुटुंब उद्ध्वस्त होणे, लंगिक अत्याचारामुळे आघात किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्याने काही वेळा असे होते. या व्यक्तींना योग्य औषध, समुपदेशन तर दिलेच जाते. त्याशिवाय जीवनामध्ये सकारात्मक राहण्यासाठी नवीन अर्थ शोधणे, नवीन नाती जुळवणे, नवीन व्यवसाय शिकवणे असे मार्गदर्शनही गरजेचे असते. पोस्ट- ट्रॉमॅटिक डीसॉर्डर काही व्यक्तींना प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसणे किंवा त्या वेळचा त्रास पुन्हा अनुभवणे, दचकणे असे वारंवार घडते. प्रसंगाशी निगडित जागा, वास, रंग, प्रहर, आवाज- म्हणजे त्या प्रसंगाचे संकेत देणारे काहीही अनुभवले की त्यांना त्रास होतो. मग त्या गोष्टीकडे दुर्लक्ष सुरू होते, ज्यामुळे त्यांचे साधारण जीवन अशक्य होते. प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसते, स्वप्न पडतात त्यामुळे कधीही त्यांचा मानसिक तोल जाऊ शकतो. त्यांच्या संवेदना उथळ होतात म्हणून त्यांची मानसिक कोंडी होते. जगाशी, इतर व्यक्तींशी आणि घटनांशी ते अलिप्त होतात आणि त्यामुळे नात्यामध्ये अंतर येऊ लागते. युद्धावरून परतलेल्या सनिकांना असा त्रास होण्याची शक्यता खूप असते. यावर उपचार करण्यासाठी संशोधन केलेले आहे. लहान मुलांमधील आजारांचे चित्र मुले दूध घेणे कमी करतात आणि सारखी रडतात, हसणे-खेळणे कमी करतात आणि त्यांची वाढ खुंटते. छोटय़ा मुलांच्या खेळात त्या प्रसंगाचे प्रतिबिंब उमटते. थोडी मोठी मुले सतत त्या विषयावर चित्रे काढतात किंवा गोष्टी लिहितात. याशिवाय बोबडे बोलणे, बिछाना ओला करणे, झोप कमी होणे, सतत आईला चिकटून राहणे, रडणे, हट्टीपणा, शाळा- अभ्यासाकडे दुर्लक्ष अशीही लक्षणे दिसून येतात. किशोरवयातील मुलांमधील बदल साधारण मोठय़ांसारखेच असतात. त्याशिवाय अंमली पदार्थ घेण्याची शक्यता असते. काही मुले या मनस्थितीत शिक्षण सोडून देतात. लहान मुलांचे समुपदेशन खेळ आणि कलेतून केले जाते. डॉ. वाणी कुल्हळी vanibk@rediffmail.com