मुखपृष्ठ >> विदर्भरंग >> गंगा मैया उन्हें माफ करना..!
 


स्पर्धेचे नियम व अटी




गंगा मैया उन्हें माफ करना..! Bookmark and Share Print E-mail
मेघना वाहोकार
वाटेत एका बंगल्याच्या प्रवेशद्वारावर आय.ए.एस. अधिकाऱ्यांची पाटी पाहिली. त्या अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला लागूनच प्लास्टीकच्या कागदाच्या झोपडय़ा आणि त्या झोपडय़ांसमोर तुटक्या खटारा रिक्षांची रांग पाहिली. आणि संपूर्ण परिस्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा अंदाज आला. याच रस्त्यावरून सकाळी फिरायला निघालेले अधिकारी पाहिले. मग कळलं की या लोकांना महाराष्ट्रात आपलं पोस्टींग व्हावं, तिथेच स्थायिक व्हावं असं का वाटत असेल! यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात राहणं म्हणजे परदेशात राहण्यासारखं आहे.
प्रत्येक बैठकीच्या वेळी भेटल्यावर आमचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य आणि बिहार प्रांताचे अध्यक्ष गंगारामजी मला बिहारला येण्याचे निमंत्रण देतात. मी मात्र प्रत्येक वेळी काही न काही कारण सांगून टाळत असते. कडक स्टार्चचा कोसाचा शर्ट व पांढरेशुभ्र धोतर घातलेले ६५ वर्षांचे सावळ्या वर्णाचे व हडकुळ्या देहयष्टीचे गंगारामजी अतिशय नम्रपणे म्हणतात, ‘बहेनजी, आप एकबार बिहार आईये, आपकी सुविधानुसार महिलाओ से मिलीये, हमारी महिला कार्यकर्ताओंसे मिलीए, उन्हें संघटन में सक्रिय होने का आग्रह किजीए, शायद वो आपसे मिलकर, आपको देखकर, प्रभावित तथा सक्रिय हो और हमारा काम बढाने में मदत हो।’
गंगारामजी इतक्या नम्रपणे व तळमळीने बोलत असतात की, हा माणूस खरंच बिहारचा आहे यावर विश्वास बसणार नाही, कारण प्रसार माध्यम आणि दंतकथांनी मनात बिहार आणि बिहारींबद्दल वेगळीच प्रतिमा निर्माण केली आहे आणि म्हणूनच मीसुद्धा बिहारचा प्रवास टाळत होते पण, यावेळी मात्र पाटण्याच्या बैठकीला नक्की जायचं असं ठरवलं. खरं म्हणजे माझ्या या निर्णयावर कोणीच (घरचे लोक, मित्र वगैरे) खूश नव्हते पण, मी त्यांच्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा केला. जाण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे बिहारच्या बैठकीला जाण्याची ही माझी दुसरी वेळ. दोन वर्षांंपूर्वी ‘गया’ (बुद्धगया) इथली बैठक झाली आणि आता पाटणा!
इथल्या विस्तीर्ण पात्राच्या दुथडी भरून वाहणाऱ्या या नद्या, भाताचे हिरवेगार शेत, आंब्याची झाडं, भरपूर खनिज संपत्ती लाभलेला हा प्रदेश निसर्गानं किती भरभरून दिले यांना. देशाला सगळ्यात जास्त आय.ए.एस. आणि आय.पी.एस. अधिकारी पुरवणारा प्रदेश म्हणूनही बिहारची ओळख आहे पण, मग बिहार आणि उत्तर प्रदेशातून माणसांचे लोंढे महाराष्ट्रात का येतात? व एकदा आल्यावर आपल्या राज्यात पुन्हा परत का जात नाहीत? या प्रश्नाने मला भंडावून सोडले. मी त्याची उत्तरं शोधू लागले.
आमच्या गाडीने बिहारमध्ये प्रवेश केला हे कळायला फार उशीर लागला नाही. मोठमोठय़ा दुधाच्या कॅन्स् धाडधाड आवाज करत खिडक्यांना अडकवल्या गेल्या आणि कडुनिंबाच्या एकसारख्या कापलेल्या कांडय़ांचे (दातून) गठ्ठे आमच्या गाडीत चढवले जाऊ लागले. अगदी छोटय़ा-छोटय़ा रेल्वेस्थानकावर म्हणजे कुठे कुठे तर अगदी निर्मनुष्य स्थानकावरसुद्धा आमची सुपर एक्स्प्रेस थांबत-थांबत वाटचाल करण्याचा प्रयत्न करीत होती. यावरूनच आपण बिहारमध्ये प्रवास करतो आहे हे नक्की झालं. तशी तिची पाटण्याला पोहोचायची वेळ सकाळी ७.०० वाजताची. माझी बैठकीची वेळ ११.०० वाजताची, त्यामुळे मी अस्वस्थ होते. सहप्रवाशाला विचारले, ‘हम पटना कितने बजे पोहचेंगे?’
‘वैसे तो इसका पटना का टाईम ७ बजे का है। लेकीन कुछ बता नही सकते।
‘कुछ तो अंदाज होगा?’ तेव्हा दुसरा प्रवासी मध्येच माहिती पुरवता झाला.
‘१०-११ बज सकते।’ आता मी अधिकच वैतागले होते.
‘आपको उतरना कहाँ है?’
‘मेन जंक्शन.. वहाँ मुझे हमारे कार्यकर्ता रिसीव्ह करने आयेंगे?’
‘कौनसा जंक्शन, यहाँ दो-तीन जंक्शन है।’
आता ते माझं कन्फ्युजन अधिकच वाढवत होते. शेवटी मी आमच्या कार्यकर्त्यांला फोन करून नेमकं कोणत्या रेल्वेस्थानकावर उतरायचं याची खात्री करून घेतली. ठरल्याप्रमाणे जगन्नाथ मिश्रा मला घ्यायला आले होते. माझी बॅग उचलून मिश्रा गर्दीतून वाट काढत समोर आणि तीच कसरत करीत मी त्यांच्या पाठोपाठ रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडलो. स्थानकाबाहेर त्यांनी जिथे त्यांची गाडी पार्क केली होती तिथपर्यंत पोहोचणेसुद्धा दिव्यच. नाक-तोंड बंद करून, श्वास रोखून मी गाडीपर्यंत पोहोचले होते व नंतरच्या ट्रॅफीकमधून गाडी काढून मुख्य रस्त्याला लागेपर्यंतचा अनुभव फारच भयानक होता. ते कर्कश्य हॉर्न, ड्रायव्हर लोकांचे संवाद, बाप रे बाप. ते तेच करू जाणोत. मुक्कामावर पोहोचल्यावर मी मोकळा श्वास घेतला आणि बैठकीला वेळेवर उपस्थित राहू शकले याबद्दल धन्य धन्य वाटले.
निवास व्यवस्था उत्तम होती. खाण्यापिण्याची चंगळ, सगळ्या तेलकट तुपकट पदार्थाची रेलचेल, आमचे सहकारी यथेच्छ ताव मारत होते पण, माझे मात्र सगळं लक्ष होते स्वयंपाक घराकडे ते आचारी त्यांचे मदतनीस आणि ती एका कोपऱ्यात आडोशाला बसून प्लेट्स आणि भांडी घासणाऱ्या चिमुकल्या हडकुळ्या काळ्या हातांकडे. त्यांना पाहून मन अस्वस्थ होतं. काही केल्या कोणत्याही पदार्थाची चव कळत नव्हती. घास घशाखाली उतरत नव्हता. मला प्रश्न पडला, इथले आमचे कार्यकर्ते नेते, हे अगदी कडक कोसाचे कपडे घातलेले गुबगुबीत, गोरेपान आहेत. इथले मजूर मात्र इतके अस्वच्छ?  स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. निदान आंघोळ करावी, केसांना तेल लावावे, असंसुद्धा यांना वाटत नसेल का? हाच प्रश्न मागच्या बुद्धगया इथल्या बैठकीच्या वेळीसुद्धा मला भंडावत होता. इथली माणसं टोकाचीच आहेत. एकतर श्रीमंत, देखणे, सुंदर किंवा दरिद्री, कुरूप, अस्वच्छ मधलं काहीच नाही.
रात्री झोपायला जातानाच एका कार्यकर्त्यांने सांगितले की, ‘कल सुबह हम सब लोग गंगाजी के दर्शन करने जायेंगे, आप भी सुबह जल्दी तैयार रहना, सुबह ६.०० बजे निकलेंगे हमलोग।’
 ‘ठीक है जरूर चलेंगे, हमे भी गंगाजी के दर्शन करना है।’
सकाळी उठून आमचा सगळा जत्था निघाला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, हरियाणा, केरळ अशा सगळ्या प्रदेशाचे आम्ही एकाच वेळी गंगामैयाला भेटायला निघालो होतो. प्रत्येकांच्या भावना, श्रद्धा, ओढ वेगळी. तोच आमचे पंजाबचे विजय शर्मा म्हणाले, ‘अरे दीदी आप गंगाजी में स्नान नही करोगे क्या?’
‘जी नही, हमने घरपर ही स्नान किया है, यहाँ के नल से भी तो गंगाजी का ही जल आता है।’
यावरून मी नास्तिक आहे याची पुन्हा एकदा सगळ्यांची खात्री पटली असावी. गंगाजीपर्यंत पोहोचायला रस्तासुद्धा किती अस्वच्छ असावा की, वाटलं खरंच माणसं पाप धुवायलाच येत असावी. नंतर असं कळलं, हा रस्ता इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता आहे. वाटेत एका बंगल्याच्या प्रवेशद्वारावर आय.ए.एस. अधिकाऱ्यांची पाटी पाहिली. त्या अधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराला लागूनच प्लास्टीकच्या कागदाच्या झोपडय़ा आणि त्या झोपडय़ांसमोर तुटक्या खटारा रिक्षांची रांग पाहिली. आणि संपूर्ण परिस्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा अंदाज आला. याच रस्त्यावरून सकाळी फिरायला निघालेले अधिकारी पाहिले. मग कळलं की या लोकांना महाराष्ट्रात आपलं पोस्टींग व्हावं, तिथेच स्थायिक व्हावं असं का वाटत असेल! यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात राहणं म्हणजे परदेशात राहण्यासारखं आहे.
इतरांप्रमाणे मलासुद्धा गंगेचे आकर्षण होतंच. धार्मिक संदर्भाबरोबरच विस्तीर्ण पात्र, डोळ्यात साठवता न येण्यासारखं गंगेचं ते रूप सगळ्यांना मोहित करणारं, शिवाय लहानपणापासून कथा-दतंकथा नंतर हिंदी सिनेमा व दूरदर्शन वरून झालेलं गंगेचं दर्शन. गंगापूजन, गंगेची ती महाआरती, मध्यंतरी एका चॅनलवरून गंगेला ‘चुनरी’ प्रदान करण्याचा तो लाईव्ह देखणा सोहोळा पाहिला होता, त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली होती. मनात ही सगळी दृश्यं ताजी होत असतानाच आम्ही गंगेच्या घाटावर पोहोचलो.
स्नान करून येणारे भक्त, त्यांच्या चेहऱ्यांवरचे धन्य धन्य झाल्याचे भाव तर स्नान करण्यासाठी पायऱ्या उतरत पात्रापर्यंत पोहोचणारे उत्सुक भक्त यांच्या चेहऱ्यावरील भाव मी अगदी तिऱ्हाईताच्या भूमिकेतून वाचत होते, कारण मी देवभोळी नाही किंवा नास्तिकसुद्धा नाही म्हणून मी त्या अरुंद २५-३० फुटाच्या घाटावर एकाच वेळी ५००-६०० लोकांना पाण्यात डुबकी घेताना कोपऱ्यात उभी राहून पाहात होते. स्त्रिया-पुरुष एकाच ठिकाणी परस्परांच्या शेजारी उभे राहून स्नान करत होते. तर त्यांच्याच बाजूला पायरीवर एक भाविक महिला खसा खसा साबण लावून कपडे धूत होती. तर शेजारी उभी राहून कोणी कपडे बदलत होते. काही मुंडण केलेले आठ-दहा लोकं बोटात गवताची अंगठी घालून ओंजळीत गंगेचं पाणी घेऊन पाण्यात उभे राहून पंडय़ाच्या त्या मंत्रोच्चाराच्या गलक्यात आपल्या आप्तांच्या, प्रियजनांच्या मुक्तीसाठी विधी करीत होते. त्यांना मोक्ष मिळावा म्हणून प्रार्थना करीत होते.
कपडे बदलण्यासाठी असलेल्या खोली वजा कट्टय़ांचा ताबा काही न्हाव्यांनी घेतला होता. तिथे श्राद्धासाठी आलेल्या लोकांचे मुंडण होत होते आणि त्या केसांचे पुंजके गंगेच्या प्रवाहातच प्रवाहित होत होते. तोच माझी नजर त्या घाटाच्या दुसऱ्या बाजूला गेली. भाजी बाजारातील, फळं बाजारातील कचऱ्याचे ट्रक तिथे पात्राला लागूनच रिकामे केले जात होते. आता माझी सहनशक्ती संपली होती. मी दुरूनच हात जोडले, गंगामातेला नमस्कार केला. कारण खाली उतरून त्या पाण्यापर्यंत पोहोचण्याचीसुद्धा शक्ती माझ्यात राहिली नव्हती. मी पायऱ्या चढून वर येऊन आमच्या सहकाऱ्यांची प्रतीक्षा करत उभी होते पण, मीच फक्त इतकी तिऱ्हाईतासारखे हे पाहात होते. हे सगळं मलाच का जाणवलं? मी का इतरांसारखी भक्तिभावाने त्या समूहामध्ये मिसळू शकले नाही? का तिथे आंघोळ करावी, पुण्य मिळवावे असं वाटलं नाही? मी उत्तर शोधत राहिले? मी पुन्हा एकदा त्या विस्तीर्ण पात्राला आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करू लागले, दोन्ही हात जोडले, डोळे मिटून प्रार्थना केली.
‘गंगा मैया मुझे माफ करना, मुझसे आपका दर्द देखा न गया और हो सके तो इन आपके भक्तो को भी! वे आपके प्यार में अंधे हो गये है, वे नही जानते वे क्या कर रहे हैं।’     ९३२६८८६७४२
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.