| ग्रामीण भागाचा विकास साधावा - क्षीरसागर |
|
|
बीड, ३ डिसेंबर/वार्ताहर सत्ता हे अंतिम साध्य नाही. ते विकासाचे आणि परिवर्तनाचे साधन आहे. जिल्हा परिषद ,पंचायत समित्या या ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. एकीच्या बळावर जिल्हा परिषदेत सत्तांतर झाले आहे तरी ग्रामीण भागात विविध योजना राबवून विकास साधावा, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयी झालेल्या समाजकल्याण सभापती गयाबाई आवाड, महिला व बालविकास सभापती बसंताबाई निकम, उद्धव दरेकर, राजाभाऊ औताडे यांचा सत्कार सार्वजनिक बांधकामम उपक्रममंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष अशोक डक, जिल्हा परिषद अध्यक्षा शोभा पिंगळे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अक्षय मुंदडा, रमेस आडसकर आदी उपस्थित होते. श्री. क्षीरसागर म्हणालेकी, जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत पोहोचविता येतात. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास मोठय़ा प्रमाणावर करता येतो. यावेळी सर्व सदस्य एकत्र आल्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तांतर होऊ शकले तरी सर्व सदस्यांनी ग्रामीण भागाच्या विकासाकरिता काम करावे. विकासाचा वाटा प्रत्येक मतदारसंघाला समान वाटला जावा. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य हा सक्षम असून हुशार आहे. मात्र संधी मोजक्याच लोकांना मिळते. पक्षश्रेष्ठींनी जी नावे सुचविली तीच नावे पुढे करण्यात आली. आपण सर्वानी ती मान्य केली. ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी जिल्हा परिषदेत सत्तांतर हा चमत्कार आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर आणि मी अनेक बैठका घेतल्या. सर्वाना एकत्र आणून विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी जिल्हा परिषदेत सत्तांतर घडवून आणले. निवडून आलेल्या सभापतींनी आपण ज्या सदस्यांमुळे निवडून आलो आहोत त्यांना न विसरता सर्वाची कामे करावीत, अशी आशा व्यक्त केली. |