विद्यार्थ्यांच्या मनात डोकावून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करताना वक्तृत्व, लेखन, संभाषण, संवाद, क्रीडा, चित्र, अभिनय, नृत्य, गायन, वादन या कलांसह सामाजिक जाणिवा निर्माण करणारी ही ‘अभिनव’ शाळा.
व्यसनाधीनतेपासून परावृत्त करून माणूस घडविणारी पूर्णा जिल्ह्य़ातील परभणी येथील अभिनव विद्या विहार ही ‘अभिनव’ शाळा होय.
१९५३ साली शहरातील काही व्यापाऱ्यांनी सदर शाळेची स्थापना केली.
शाळेची प्राथमिक व माध्यमिक अशी वेगळी युनिटे असून, दोन हजारांवर विद्यार्थी शिकतात. ग्रामीण भागासह शहरातील दलित, मुस्लीम व इतर मागासवर्गीयांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या वर असूनही गुणवत्तेची परंपरा राखली आहे. शाळेत भौतिक सुविधांसह आज अद्ययावत संगणक शाळा, विज्ञान प्रयोगशाळा, भव्य ग्रंथालय, वाचनालय व क्रीडांगण उपलब्ध आहे.
शाळेने तीन पिढय़ांचा वारसा जपला आहे. हजारो विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी रवाना झालेले आहेत. शाळेने नामवंत वकील, आमदार, खासदार घडविले. राज्याच्या प्रशासकीय सेवेत मोठय़ा हुद्दय़ावर आजही अनेक विद्यार्थी काम करताना शाळेचा अभिमानाने उल्लेख करतात.
शाळेने स्वत:ची शिस्त निर्माण केली आहे. विशिष्ट अशा परिपाठातून मूल्यशिक्षण, विविध जयंती, पुण्यतिथीच्या उपक्रमांतून चरित्र शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकशिक्षणाचे धडे येथे दिले जातात. वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून कलांचे दर्शन घडविले जातेच, पण व्यक्तिभिन्नता तपासून कलागुणांचा शोध घेत विद्यार्थ्यांतील व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला जातो. मुलांमध्ये वाचन लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘मयूर’ हस्तलिखिताचे संपादन केले जाते. माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरावे यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन केले जाते.
शाळा दरवर्षी दूरदूरच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन करते. महाराष्ट्राबाहेरही सहलींचे आयोजन करून प्रकल्प भेटी, कारखान्याच्या भेटी, कार्यालयांना भेटी देऊन त्यांच्या कामकाजाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाते. शाळा विविध उपक्रम राबविते. वृक्षारोपण, रक्तगट तपासणी, आपद्ग्रस्तांसाठी मदत फेरी, साक्षरता फेरी, बेटी बचाव फेरी, पल्स पोलिओ मोहीम, एड्स जागृती उपक्रम, व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, खरी कमाई, राष्ट्रीय छात्र सेना दिवस यातून सामाजिकता जपली आहे.
दहावीचा निकाल उंचावण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. आगाऊ सराव परीक्षा, घटक चाचण्या यासह शिक्षक मुलांच्या गृहभेटी घेऊन पालक विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेतात. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, नवोदय प्रवेशपरीक्षा मार्गदर्शन आदींसह वेगवेगळ्या विषयांच्या विविध परीक्षाही घेतल्या जातात.
शाळेने ई-लर्निग क्लास रूम अद्ययावत तयार केली असून माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो. उत्कृष्ट संगणक कक्ष असून विद्यार्थी इंटरनेटचाही वापर चपखलपणे करतात. परिपाठात मराठी दिन, विज्ञान दिन, हुतात्मा दिन साजरे केले जातात. विज्ञान प्रदर्शनात शाळेचे प्रयोग राज्यस्तरापर्यंत अनेकदा पोहोचले.
राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र आर.डी. परेडपर्यंत पोहोचले. अनेक विद्यार्थी सैन्यात भरती होऊन श्रीलंकेच्या शांतिसेनेतही सामील झाले. अनेकांनी मेजपर्यंत मजल मारली.
शाळेने रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सवही साजरा केला. शाळेत आजही विद्यार्थी घडविण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे. स्वयंशिस्तीला विशेष महत्त्व दिले जाते. सर्व जाती-जमातीतील विद्यार्थी एकत्रपणे व मुला-मुलींचे सहशिक्षण पद्धतीने शिकणे चालू आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच चार भिंतीपलीकडचे शिक्षण शाळा देत आली आहे व देत आहे. पंचक्रोशीत शाळेने नावलौकिक मिळविला आहे. तर अशी आहे अभिनव उपक्रमांची खाण ‘अभिनव विद्या विहार’ शाळा.
मुख्याध्यापक, अभिनव विद्या विहार प्रशाला,
पूर्णा जं. जि. परभणी. पिन- ४३१५११ महाराष्ट्र.
कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
reshma.murkar@expressindia.com,  reshma181@gmail.com