संलग्नता नसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना २०१४-१५च्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत (कॅप) सहभागी केले जाणार नाही, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने बजावल्याने महाविद्यालयांबरोबरच मुंबई विद्यापीठाचीही मोठी पंचाईत झाली आहे. कारण, विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्वच म्हणजे सुमारे ७० महाविद्यालयांकडे कायम तर सोडाच, पण २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांपुरतीही संलग्नता नाही. किंबहुना, गेली चार वर्षे तात्पुरत्या संलग्नतेसाठीची प्रक्रियाच विद्यापीठाने राबविलेली नाही. या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे.आता संलग्नतेची किचकट व वेळखाऊ प्रक्रिया घाईघाईने उरकावी लागणार असून, त्यासाठी विद्यापीठाच्या संलग्नता विभागाला कामाला लावण्यात आले आहे. समित्यांसाठी नावे काढण्याचे काम सुरू असून, येत्या आठवडाभरात या समित्या महाविद्यालयांमध्ये रवाना करण्यात येतील. या समित्यांचा अहवाल विद्वत परिषदेत मांडला जातो. या परिषदेने मान्यता दिल्यानंतर मग महाविद्यालयाला तात्पुरती संलग्नता दिली जाते.संलग्नता नसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना कॅपमध्ये सहभागी होता येत नाही. त्यातून महाराष्ट्रातील फार कमी महाविद्यालयांकडे कायम संलग्नता आहे. कारण, फारच थोडय़ा महाविद्यालयांमध्ये ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) ठरवून दिलेल्या निकषांनुसार पायाभूत व शैक्षणिक सुविधांची पूर्तता केली आहे. पण ही महाविद्यालये प्रवेशांपासून वंचित राहू नयेत म्हणून प्रत्येक महाविद्यालयाला त्या त्या शैक्षणिक वर्षांपुरती तात्पुरती संलग्नता देऊन त्यांना कॅपमध्ये सहभागी करून घेतले जाते. त्याकरिता संबंधित विद्यापीठाने त्या त्या महाविद्यालयात ‘स्थानीय चौकशी समिती’ (एलआयसी) पाठवून तेथील पायाभूत व शैक्षणिक सुविधांची पाहणी करायची असते. या समितीच्या अहवालानंतर त्या महाविद्यालयाला त्या शैक्षणिक वर्षांपुरती संलग्नता दिली जाते. समित्या पाठविण्यामागे संबंधित महाविद्यालयातील सुविधांची तपासणी करणे, हा महत्त्वाचा भाग असतो. सुविधांची येत्या काळात पूर्तता करण्याच्या अटीवर ही तात्पुरती संलग्नता दिली जाते. मुंबईसह सर्वच विद्यापीठांमध्ये हा शिरस्ता वर्षांनुवर्षे पाळला जात आहे. त्यात महाविद्यालयांची अडवणूक अभावानेच केली जाते. मात्र गेल्या चार वर्षांत मुंबई विद्यापीठाने या समित्याच महाविद्यालयांमध्ये पाठविलेल्या नाहीत. म्हणजे त्या त्या शैक्षणिक वर्षांसाठी संलग्नता देण्यासाठी जी काही तोंडदेखली प्रक्रिया पार पाडावी लागते, त्यालाही विद्यापीठाने फाटा दिलेला आहे.विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ ‘मुंबई युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन’ या संघटनेने ही बाब तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नुकतीच लक्षात आणून दिली. विद्यापीठाची संलग्नता न मिळविणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेने १ एप्रिल, २०१४ला पत्र लिहून संचालनालयाकडे केली. त्यावर संचालनालयही खडबडून जागे झाले. त्यांनी आता मुंबई विद्यापीठाला पत्र लिहून ज्या ज्या महाविद्यालयांनी २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांची संलग्नता घेतलेली नाही, त्यांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेणार नाही, असे कळविल्याने विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या संबंधात तंत्रशिक्षण संचालक सु. का. महाजन यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.