परळच्या आर. एम. भट हायस्कूलचा प्रत्येक वर्ग येत्या १८ जानेवारीला जुन्या आठवणी जिवंतपणे अनुभवणार आहे. तेच वर्ग, तीच पहिली घंटा, तीच प्रार्थना, तेच शिक्षक, तीच मधली सुट्टी, तोच जेवणाचा डबा.. सारे काही तेच, तसेच! फरक एवढाच, की १९६० नंतरचे माजी विद्यार्थी आता अनेक वर्षांनंतर आपल्या बालपणात पुन्हा डोकावणार आहेत, आणि भूतकाळातील आठवणींना उजाळा देणारा प्रत्येक वर्ग, शाळेच्या भविष्याची नवी आखणी करणार आहे..आणखी चार वर्षांनी, २०१८ मध्ये या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होतील. या प्रदीर्घ वाटचालीत, शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात आर एम भट हायस्कूलमधील दिवसांच्या आठवणी अजूनही तितक्याच टवटवीत आहेत. त्या वेळी झालेली भांडणे, शाळा भरल्यावर म्हटलेली सामूहिक प्रार्थना, मधल्या सुट्टीत एकत्र बसून केलेले सहभोजन, शिक्षकांच्या छडय़ांचे तळहातावर उठलेले वळ, शेवटच्या बाकावर बसून केलेला खोडकरपणा, शाळा संपेपर्यंत पायाचे आंगठे धरून ओणवे राहण्याची शिक्षा भोगण्यात केलेली टाळाटाळ, चिंचा-बोरं, भेळ आणि वडे.. सारे काही अगदी काल घडल्यासारखे प्रत्येकानेच आपापल्या मनात जपून ठेवलेले असते. आर एम भट हायस्कूलचे माजी विद्यार्थी याला अपवाद नाहीत. म्हणूनच, असे आगळे स्नेहसंमेलन भरविण्याची कल्पना रविवारी माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत मांडल्यानंतर उपस्थित २०० माजी विद्यार्थ्यांचे डोळे चमकले.. येत्या १८ जानेवारीच्या त्या कार्यक्रमाची आखणी कशी करावी याची चर्चा सुरू झाली. माजी विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यास आता सुरुवातही झाली आहे.१८ जानेवारीची प्रतीक्षा‘पुन्हा एकदा शाळेत’ अशी संकल्पना घेऊन १८ जानेवारीचा शाळेचा दिवस आगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे. सुमारे दोन हजार माजी विद्यार्थी या दिवशी शाळेत येतील, शेवटच्या वर्षी ज्या वर्गात ते बसत होते, तेथे जमा होतील. मधल्या सुट्टीतील तेच डबे असतील. सकाळी शाळा भरल्याची तीच घंटा, त्यावेळचा शिपाई ती वाजवेल. प्रार्थनेनंतर वर्ग सुरू होईल. त्या वेळी असलेले शिक्षकच त्या वर्गात मुलांशी संवाद साधतील असेही ठरले आहे. माजी शिक्षकांशी संपर्क सुरू झाला आहे. ‘आरएमबाईटस.ओआरजी’ नावाची एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.पालघरमध्ये ‘डायट’ला मंजुरीमुंबई : ठाणे जिल्ह्याचे विभाजन केल्यानंतर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यात ‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था’ (डायट) उभारण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या जिल्ह्यात ‘डायट’ची स्थापना करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. केंद्राच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘डायट’ असावे. यानुसार राज्यात सध्या ३३ जिल्ह्यांत ‘डायट’ कार्यरत आहे. ठाणे जिल्ह्यात ही प्रशिक्षण संस्था पूर्वी जव्हार येथे होती. मात्र नुकतीच ती अंबरनाथ तालुक्यातील रहाटोली येथे नवीन वास्तुत स्थलांतरित करण्यात आली आहे. अंबरनाथ तालुका ठाणे जिल्ह्यात येत असल्याने पालघरसाठी ‘डायट’ची निर्मिती होणे गरजेचे आहे. यानुसार शासनाने प्रशिक्षण संस्था सुरू करण्या परवानगी दिली असून जिल्ह्याधिकाऱ्यांना जागा शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.