मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ‘शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याचा निर्णय घेऊन पालिका प्रशासनाने शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांना त्याबाबतचे प्रशिक्षण दिले. शाळा इमारत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या आराखडय़ातील माहिती भरून तो शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले. पण तब्बल ११०० पैकी केवळ १५५ मुख्याध्यापकांनी आवश्यक ती माहिती भरून आराखडा सादर केला. शाळेच्या सुरक्षिततेबाबतची मुख्याध्यापकांची उदासीनता तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे. परिणामी, आता हा आराखडा भरून घेण्यासाठी मुख्याध्यापकांना पुन्हा एकदा मार्गदर्शन देण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे.सुरक्षा रक्षकाचा अभाव, समाजकंटकांचा वावर, मोडकळीस आलेल्या इमारती, अग्निशमन प्रतिबंधक उपकरणांचा अभाव अशा विविध कारणांमुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आहे. त्यातच पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सावध झालेल्या पालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ‘शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्याचा निर्णय घेतलाव महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले.हे प्रशिक्षण घेणाऱ्या ११०० पैकी केवळ १५५ मुख्याध्यापकांनी आवश्यक ती माहिती भरून आराखडा शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. ८४५ मुख्याध्यापकांच्या उदासीनतेमुळे पालिका शाळेतील तब्बल साडेचार लाख विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या प्रकारामुळे पालिका प्रशासनही चिंतेत पडले असून आता पुन्हा एकदा लवकरच मुख्याध्यापकांना पालिका मुख्यालयात बोलावून ‘शालेय आपत्ती व्यवस्थापना’चे धडे देण्याचा विचार प्रशासन करीत आहे. ‘शालेय आपत्ती व्यवस्थापना’चे धडे गिरविल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापकांची उदासीनता आराखडय़ात खोडा बनू नये म्हणून प्रशिक्षणस्थळीच त्यातील आवश्यक ती माहिती भरून घ्यावी असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे आता मुख्याध्यापकांना उदासीनता झटकून विद्यार्थी व शाळेच्या सुरक्षिततेसाठी आराखडा तयार करून द्यावाच लागेल, असे पालिकेच्या शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.सुरक्षाविषयक मार्गदर्शन कागदावरचपालिकेच्या शिक्षण विभागाने दादर येथील हिंदू कॉलनीमध्ये आयोजित केलेल्या स्काउट गाइडविषयक कार्यक्रमात उपस्थित मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण देण्याचे ठरविले. सुमारे सात ते आठ दिवस तब्बल ११०० मुख्याध्यापक आणि शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती काळात कोणती काळजी घ्यावी, आग लागू नये अथवा लागल्यास काय करावे, दहशतवादी हल्ला झाल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी कसे हलवावे आदींबाबतचे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. त्यानंतर ‘शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा’ कसा भरावयाचा याचीही माहिती देऊन आराखडय़ाचे नमुने मुख्याध्यापकांना देण्यात आले. आराखडय़ातील गाळलेल्या जागी इमारतीची रचना, वर्ग खोल्यांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या आदी आवश्यक ती माहिती भरून तो शिक्षण विभाग आणि पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच आपत्कालीन प्रसंगी हा आराखडा मिळावा यासाठी त्याची एक प्रत शाळेत ठेवण्याची सूचनाही करण्यात आली होती.