राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे टंक आणि लघुलेखनाच्या परीक्षेपासून अनेक विद्यार्थी वंचित राहत आहेत. याबाबत राज्य परीक्षा परिषदेकडे लक्ष वेधले असता विद्यार्थ्यांना कोणतीही सवलत देण्यास ते तयार नसल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले आहेत. राज्यात सध्या टंक आणि लघुलेखनाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. याच दरम्यान विविध विद्यापीठांच्या परीक्षाही सुरू आहेत. यात मुंबई विद्यापीठाची एमकॉमची, तर पुणे विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेचा समावेश आहे. या परीक्षेच्या वेळेत टंकलेखन किंवा लघुलेखन परीक्षेची वेळ निवडलेल्या विद्यार्थ्यांना वेळ बदलून देण्यास राज्य परीक्षा परिषदेने नकार दिला आहे. टंकलेखन आणि लघुलेखनाची परीक्षा चार दिवस असते व ही परीक्षा दिवसांतून चार वेळा होते. म्हणजे चार दिवसांत १६ वेळा परीक्षा होते. यामध्ये कोणतीही एक वेळ विद्यार्थ्यांना निवडायची असते; पण नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये अनेकदा विद्यापीठांच्या किंवा महाविद्यालयीन परीक्षांची अडचण समोर येते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या वेळेपेक्षा त्याला सोयीस्कर अशी वेळ निवडण्याची मुभा द्यावी याकडे अभ्यंकर लघुलेखन आणि टंकलेखन संस्थेचे अशोक अभ्यंकर यांनी लक्ष वेधले. बुधवारी पार पडलेल्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना एमकॉमची परीक्षा असल्यामुळे परीक्षा देता आली नाही, तर राज्यातील विविध विभागांत हीच परिस्थिती आहे. हाच प्रश्न शुक्रवारीही निर्माण होणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना टंकलेखनाच्या परीक्षेपासून वंचित ठेवण्यापेक्षा त्यांना त्यांच्या सोयीने वेळ निवडण्याची मुभा द्यावी, असेही अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. या संदर्भात त्यांनी परीक्षा परिषद, शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिवांना पत्रही लिहिले आहे. २०१३ मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण सचिवांनी अशी मुभा दिली होती. त्याचाच आधार घेत आताही विद्यार्थ्यांना मुभा दिल्यास हजारो विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचेल, अशी अपेक्षाही अभ्यंकर यांनी व्यक्त केली आहे.