चुरशीने लढल्या गेलेल्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १०४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. सत्तेसाठी संघर्ष करणाऱ्या दोन्ही आघाडय़ांकडून आपल्याच विजयाचा दावा करण्यात आला. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीनंतरच मतदारांचा कौल समजणार असला तरी त्यावरून पजा लागल्या आहेत. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गेले काही दिवस राजकीय वातावरण तापले होते. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील आणखी एक सामना पाहायला मिळत आहे. शिवाय तालुक्यातील गटातटाचे मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात शड्ड ठोकून उभे राहिल्यामुळे सर्वाचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समविचारी पक्षांची रवळनाथ स्व. वसंतराव देसाई शेतकरी विकास आघाडी आणि अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर, रवींद्र आपटे, स्वाभिमानी, शिवसेना, भाजप यांची संस्थापक स्व. वसंतराव देसाई शेतकरी विकास महाआघाडी यांच्यात लढत होत आहे. चुरशीच्या लढतीचा प्रत्यय आज सर्व मतदान केंद्रांवर दिसून आला. उत्तूर-मडिलगे उत्पादक गटातील मतदान २२ मतदान केंद्रांवर, बिगर उत्पादक गटातील मतदान उत्तूर येथे कुमार विद्यामंदिर येथे, आजरा-श्रुंगारवाडी उत्पादक गटातील मतदान १८ मतदान केंद्रांवर, बिगरउत्पादक गटातील मतदान आजऱ्यातील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये, गवसे-पेरणोली उत्पादक गटातील मतदान २० मतदान केंद्रांवर, बिगर उत्पादक गटातील मतदान पेरणोली हायस्कूल व केंद्रीय शाळा गवसे येथे तर भादवण-गजरगाव उत्पादक गटातील मतदान १६ मतदान केंद्रांवर पार पडले.