सत्तेशिवाय विकास ही संकल्पना फसवी आहे. समाजकारणाबरोबर राजकारण केलेच पाहिजे. सध्या राजकारणाचे विकृतीकरण करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी राजकारणापासून दूर न राहता राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मार्क्‍सवादी नेते, राजकीय विश्लेषक डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.

मराठी भाषा विभाग, राज्यशास्त्र विभाग व श्रमिक प्रतिष्ठानतर्फे कॉ. गोिवदराव पानसरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठात गुरुवारी कार्यक्रम झाला. ‘जागतिकीकरणाचे बदलते स्वरूप आणि आपण’ या विषयावरील परिसंवादात कानगो यांनी ‘आंतरराष्ट्रीय अर्थ : राजकारणाचे बदलते स्वरूप’ यावर मते मांडली.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत समूहकेंद्रित भांडवलशाही गतीने पुढे जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता कोंडीत सापडली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या या धोरणामुळे पुन्हा एकदा भांडवलदारांचा वर्चस्ववाद वाढण्याचा धोका आहे. या पाश्र्वभूमीवर मानवकेंद्रित राष्ट्रवादाची नव्याने उभारणी करणे काळाची गरज आहे, असा उल्लेख करून डॉ. कानगो म्हणाले, समता हे भारतीय श्रेष्ठत्व समजले जाते. प्रत्यक्षात मात्र वर्चस्ववादाचे श्रेष्ठत्व वाढत आहे. नवभांडवलशाहीची खाबुगिरी, तंत्रज्ञानातील वाढते बदल याला पर्याय म्हणून पंडित नेहरूंच्या काळातला सर्वसमावेशक राष्ट्रवाद आज आवश्यक आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या एकात्मीकरणाने नवी आव्हाने उभी केली आहेत. या गतिमान प्रक्रियेपासून माणूस मुक्त नाही. आजची गतिमान प्रक्रिया प्रत्यक्ष जगण्याच्या व्यापक संघर्षांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भांडवलशाहीला वेळीच रोखण्यासाठी, जागतिकीकरणात बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी ‘मॉईज्ड अ‍ॅग्रीकल्चर’ ही संकल्पना भारताने स्वीकारणे गरजेचे आहे, असे डॉ. कानगो यांनी स्पष्ट केले.

जागतिकीकरणातील अंतर्वरिोध : धोके आणि संधी’ या विषयावर मुंबईतील प्रा. संजीव चांदोरकर म्हणाले, तीन दशकांनंतर आजची स्थिती भयावह आहे. दारिद्रय़ातून विषमता आणि अस्थर्य स्पष्टपणे दिसत आहे. दुसऱ्या सत्रात ‘भारतातील नवफॅसिझमचे स्वरूप’ या विषयावर डॉ. माया परिमल यांनी मार्गदर्शन केले. ‘महाष्ट्रातील अस्मितांचे राजकारण आणि पुरोगामी पक्षांची भावी दिशा’ या विषयावर संवादाचा समारोप झाला. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. राजन गवस, प्रा. संजीव चांदोरकर, रघुनाथ ढमाले, सुधाकर मानकर, प्रकाश पवार, डॉ. मेघा पानसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.