पवारांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवरील निवड फडणवीस यांनी केल्याची टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केली होती. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी मेळाव्यात पवारांना उत्तर दिले. ही निवड राष्ट्रपती कोटय़ातून व्हावी यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. मी फक्त छत्रपतींचा सेवक या नात्याने लखोटा पोहोचवण्याचे काम केले असे स्पष्ट केले.

कागलच्या छत्रपती शाहू सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावर शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. या शेतकरी मेळाव्यापूर्वी कागल शहरात  मकराना संगमरवरात बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

जागतिक बँकेने दिलेल्या ६०० दशलक्ष डॉलर्सच्या अल्प व्याजदरातील अर्थसाहाय्याद्वारा राज्य शासन दुष्काळग्रस्त गावांसाठी सुनियोजित प्रकल्प राबवत आहे. यामुळे शेतीला पाणी मिळेल, पण पाण्याचे मूल्य लक्षात घेण्याबरोबरच शेतीपूरक उद्योग सुरू केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. हे मुद्दे विचारात घेऊन राज्य शासन शाश्वत शेती धोरण राबवत असून याद्वारे शेतकरी सधन व सक्षम बनवला जाणार आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी मेळाव्यात केले.

शेतीत नव्या तंत्राचा वापर हवा

राज्याच्या सकल उत्पनात कृषी क्षेत्राचा ११ टक्के वाटा आहे, पण कृषी क्षेत्रावर आधारित ५५ टक्के लोक अवलंबून आहेत. अन्य क्षेत्रावर ४५ टक्के लोक अवलंबून असले तरी त्यांचा वाटा ८९ टक्के आहे. त्यासाठी शेतीतील उत्पादकता वाढणे, शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, कमीतकमी पाण्यावर शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर या बाबींचा विचार करून शेती आíथकदृष्टय़ा किफायतशीर होण्यासाठी शेतीत विविध मार्गाने गुंतवणूक होण्याची गरज आहे. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी प्रास्ताविकात समूहाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संचालक वीरकुमार पाटील यांनी आभार मानले.