शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे विजेची तार तुटून पडल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. युवराज कोळी असे जागीच मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून बाबासाहेब परिट हे जखमी झाले. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत होती.

यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रीज मागे असणाऱ्या जयवंत पाटील यांच्या शेतात दोघेजण दुपारी शेतीची मशागत करत होते. पाटील यांच्या शेतातून महावितरणची विजेची तार गेली आहे.

ती तुटून पडल्याचे शेतात काम करणाऱ्या युवराज कोळी व बाबासाहेब परीट या शेतकाऱ्यांच्या लक्षात आले नाही. सर्वप्रथम बल जोडीला विजेचा प्रवाह लागला. ते  लक्षात आल्यावर कोळी यांनी कटीच्या सहाय्याने तार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यात कोळी यांना जबर धक्का लागल्यामुळे ते जागीच कोसळले. तसेच बाबासाहेब परीट यांनाही धक्का लागून ते गंभीर जखमी झाले.

या दोघांना काही शेतकऱ्यांनी खासगी दवाखान्यात आणले असता कोळी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी  सांगितले. परीट यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.