मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावरील आरोप निश्चितीस ११ जुलपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे समीर वरील आरोप निश्चिती १२ जुलपर्यंत स्थगित करण्याचे आदेश शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दिले.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गायकवाडवर कोल्हापूर पोलिसांच्या वतीने १४ डिसेंबर रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडे असून जिल्हा व सत्र न्यायालयात समीरवरील आरोप निश्चितीबाबत सुनावणी सुरू आहे.

सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी शुक्रवारच्या सुनावणीवेळी सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली. पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर एकाच हत्यारातून गोळीबार झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. यासाठी सीबीआयने पानसरे यांच्यावरील गोळीबारातील पुंगळ्या आणि गोळी तपासासाठी स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे पाठविल्या आहेत. याचा अहवाल अद्याप प्राप्त नाही. स्कॉटलंड यार्ड पोलिसांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत समीरवरील आरोप निश्चितीला स्थगिती द्यावी, अशी मागणी अर्जाद्वारे अ‍ॅड. बुधले यांनी न्यायालयाकडे केली.

समीरचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी बातमीचा संदर्भ देत एसआयटी पथक आणि सीबीआयने डॉ. वीरेंद्र तावडेंची घरझडती घेतली. तसेच फोंडय़ाच्या रामनाथी आश्रमावर छापा टाकल्याच्या वृत्ताचे कात्रण सादर केले. एसआयटी पथकाने अशाप्रकारे छापा टाकला असेल तर छापा टाकण्यापूर्वीची नोटीस, घटनास्थळाचा पंचनामा न्यायालयात सादर करावा अशी मागणी केली. जर असे छापे टाकले नसतील तर चाललेली सनातन संस्थेची बदनामी थांबवावी, असा युक्तिवाद केला.

मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी समीरच्या जामीन अर्जाबाबत ८ जुल तर आरोप निश्चितीला ११ जुलपर्यंत स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच कोल्हापूर सत्र न्यायालयात समीरवर आरोप निश्चिती करण्यात येईल. यामुळे आता पुढील सुनावणी १२ जुलपर्यंत लांबणीवर पडली आहे.