ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनावेळी घटनास्थळी दोघे नाहीत, तर चौघे जण असल्याचा दावा सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी आज केला. या प्रकरणातील हा नवा खुलासा सुनावणीवेळी शुक्रवारी पुढे आला आहे. पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामिनावर उद्या शनिवारी निर्णय होणार आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याला जामीन दिला तर तो इतर सनातन संस्थेच्या आरोपींसारखा फरार होण्याची शक्यता असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद निंबाळकर यांनी आज सुनावणी दरम्यान केला. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याला जामीन मिळावा यासाठी गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याची स्वतंत्र सुनावणी सुरू आहे. या जामीन अर्जावर निंबाळकर यांनी आज युक्तिवाद केला. या वेळी गायकवाडला जामीन मिळाल्यास तो फरार होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली. गंभीर गुन्ह्णााचे आरोप असलेले सनातन साधक फरार असल्याचा दाखला त्यांनी या वेळी दिला. तसेच या प्रकरणात पुरवणी आरोपपत्रात यापूर्वीच नमूद केल्याप्रमाणे पानसरे यांच्या खुनावेळी घटनास्थळी चार लोक उपस्थित असल्याचा पुनरुच्चार निंबाळकर यांनी केला. तर हत्येसाठी वापरण्यात आलेल्या रिव्हॉल्व्हरमध्ये साम्य असल्याचा उल्लेखदेखील त्यांनी केला. या खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याला जामीन दिला तर साक्षीदारांवर दबाव आणला जाईल, असे म्हणत सरकारी वकिलांनी गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. यापूर्वीही अॅड. पुनाळेकर यांनी या प्रकरणातील साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामुळे समीर गायकवाड याला जामीन देणे योग्य होणार नाही, असे निंबाळकर यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.