स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कोल्हापूर जिल्हा देशात अव्वल ठरलाय. स्वच्छतेवर आधारित गुणांकनानुसार जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 'स्वच्छता दर्पण' पुरस्काराने कोल्हापूर जिल्ह्यास गौरविण्यात येईल. स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार जिल्हयाला ९० टक्के इतके गुण मिळाले. २५ सप्टेंबरपर्यंत झालेल्या कामगिरीवरुन हे गुणांकन ठरले. केंद्र शासनाकडून कामगिरी, शाश्वतता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांना गुण देण्यात आले. त्यानुसार जिल्हयाला कामगिरीमध्ये ५० पैकी ५० गुण, शाश्वतता या घटकांसाठी २५ पैकी १५ गुण तर पारदर्शकतेसाठी २५ पैकी २५ गुण प्राप्त झाले. स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा हे तीन जिल्हे प्रथम क्रमांकावर आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत ), गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी, आणि ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तर काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई व या विभागातील तज्ज्ञ व सल्लागार यांनी परिश्रम घेतले.