तीन वर्षांनंतर पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी अपूर्व क्षण स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय नर-मादी धबधबा सोमवारपासून ओसंडून वाहू लागला आहे. येथील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरण १०० टक्के भरले आहे. अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे महालात येऊन नर-मादी धबधब्यातून वाहते. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक नळदुर्ग किल्ल्यात गर्दी करत आहेत. नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यास खास नर-मादी धबधब्यामुळे ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या किल्लयात बोरी नदीवर पाणी महल बांधलेला आहे. गेल्या तीन-चार वर्षांत अवर्षणामुळे बोरी नदीत पाणी आले नसल्याने नर-मादी धबधबा सुरू झाला नव्हता. तो यंदा सुरू झाला आहे. साधारण १३५१ ते १४८० या बहामनी काळात किल्ल्यात ५५० फूट लांब, ५० फूट रुंद, ७० फूट उंच असा पाणी महाल बनविण्यात आला आहे, किल्ल्याच्या उत्तरेकडून वाहत येणाऱ्या बोरी नदीचे पाणी किल्ल्यामध्ये वळवून या प्रवाहास चंद्रकोरीचा आकार देऊन ते पुन्हा उत्तरेकडे वळविले आहे. या पाण्याच्या मार्गात मोठा दगडी बंधारा बांधला असून त्यामध्ये दोन मोठे सांडवे सोडले आहेत. हे पाणी ६५ ते ७० फुटांवरून खाली पडते. या सांडव्यांना नर-मादी म्हणून संबोधले जाते. या बंधाऱ्यावर सोडलेल्या सांडव्याची उंची कमी-जास्त आहे. यातील कमी उंचीस मादी तर उंच बाजूस नर असे संबोधले जाते. पाणी महल या इमारतीत पर्शीयन भाषेत नोंदी असून इब्राहिम आदिलशाह यांच्या काळात वास्तुविशारद मीरमहंमद इमादीन यांनी हा पाणी महाल बांधला. पाण्याच्या संपर्कात असलेल्या या महालात एक थेंबही पाणी पाझरून बाहेर येत नाही.