कोल्हापूर परिसरात पाऊस असला तरी गेल्या महिनाभरापासून ज्याची प्रतिक्षा होती ते शाहुकालीन राधानगरी धरण शनिवारी शंभर टक्के भरले. त्यामुळे धरणातील पाणी ओसांडूंन वाहू लागले आहे. यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाले मात्र, मधल्या काळात पंधरा दिवसांची मोठी विश्रांती पावसाने घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होता. मात्र, गणेशाच्या आगमनबरोबर पुन्हा वरुण राजाचेही आगमन झाल्याने जवळपास भरण्याच्या टप्प्यावर असलेले राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाळी ११ वाजून २५ मिनटांनी धरण १०० टक्के भरले. पूर्ण धरण भरल्याने १२ वाजून ५० मिनिटांनी एक स्वयंचलीत दरवाजा तर १ वाजून ५ मिनिटांनी दुसरा दरवाजा खुला करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी ही माहिती दिली. उपजिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, राधानगरी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे स्वयंचलीत दरवाजा क्रमांक तीन दरवाजा क्रमांक ६ खुला करण्यात आला. याद्वारे पाच हजार क्युसेक प्रती सेकंद या वेगाने पाण्याने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.