बौद्धिक अक्षम मुलांना सर्वागाने सक्षम बनवण्याचा वसा कोल्हापुरातील ‘चेतना अपंगमती शिक्षण संस्थे’ने हाती घेतला आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेने या मुलांना मायेची ऊब दिली, नवी भरारी घेण्यासाठी सक्षम बनवले. मात्र, संस्था अद्याप कायमस्वरूपी जागेच्या शोधात असून, संस्थेचा गाडा इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी दानशूरांची गरज आहे. बौद्धिक अक्षम बालकांना शिक्षण-प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यात या संस्थेची कामगिरी मोठीच. समाजात अशा प्रकारच्या बालकांबद्दल गैरसमज आणि पालकांमध्ये न्यूनगंड अधिक. मात्र, या मुलांना शिक्षण-प्रशिक्षणातून सक्षम करतानाच पालक आणि नागरिकांचे संस्थेद्वारे प्रबोधनही करण्यात येते. पालक-शिक्षक संघ हा घटक संस्थेत कार्यरत आहे. या माध्यमातून मुले आणि पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘गतिमंदत्व : गैरसमज व वास्तव’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून व्याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे, परिसंवाद असे विविध उपक्रम संस्था राबवते. अशा मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, याचेही मार्गदर्शन संस्थेकडून केले जाते. या गरजा आणि कल यांची सांगड घालून संस्थेने केलेल्या अथक परिश्रमांमुळे ही मुले स्वतच्या पायावर उभी राहिली आहेत. संस्थेने उद्योग केंद्रे निर्माण केली असून, त्यात विद्यार्थी विविध कामे करतात. कष्ट, अनुभव व अर्थार्जन साध्यतेचा हा प्रयत्न. आगामी उपक्रम बौद्धिक अक्षम मुलांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने चेतना प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २०० विद्यार्थ्यांसाठी शाळा, १५० विद्यार्थ्यांसाठी उद्योग केंद्र, बालमार्गदर्शन केंद्र, वाचा उपचार केंद्र, वसतिगृह, एकत्रित शिक्षणासाठी बालवाडी आणि प्राथमिक शाळा यांचा समावेश असेल. चेलवी प्रकल्प हा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पांतर्गत २० एकर जागेवर शेती, कुक्कुटपालन, रेशीम उत्पादनाद्वारे संस्थेतील सुमारे १०० मुलांचे पुनर्वसन अपेक्षित आहे. यासाठी देणगी, वस्तू स्वरूपाने तसेच संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पवन खेबूडकर करतात.