उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा आक्रमक पवित्रा

राज्याचा उद्योगमंत्री मीच असल्याने मुंबईत होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमास कोणाला निमंत्रित करायचे हे मीच ठरविणार असल्याचे सांगत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या  कार्यक्रमास उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करणार असल्याचे संकेत येथे पत्रकारांशी बोलताना दिले. ‘मेक इन इंडिया’ ही मोहीम पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून साकारली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यातून राज्याचा औद्योगिक लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणाच्या वादातून देसाई यांनी मंत्रीपदाच्या अधिकारावर बोट ठेवल्याने सेना-भाजपमधील तणातणी पुन्हा वाढली आहे.

१३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे आयोजन होत आहे. हा सप्ताह यशस्वी व्हावा यासाठी उद्योगमंत्री या नात्याने सुभाष देसाई हे राज्यभरातील उद्योजकांशी संवाद साधत आहेत. या अंतर्गत त्यांनी शुक्रवारी करवीर नगरीतील उद्योजकांची भेट घेतली.

यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमापासून उद्धव ठाकरे यांना दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याकडे लक्ष वेधले असता देसाई यांनी, या कार्यक्रमाचा मी निमंत्रक आहे. राज्याचा उद्योगमंत्रीही मीच आहे. त्यामुळे त्याचे निमंत्रण कोणाला द्यायचे हेही मीच ठरविणार आहे, असे सांगितले.

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उद्योग विभागाने ४२ नवीन शासन आदेश काढल्याची माहिती त्यांनी दिली.  त्याचवेळी मंत्रिमंडळाचे  निर्णय न राबविणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.