वेगवेगळय़ा कारणांमुळे आग लागण्याचे प्रकार आजवर घडले असताना करवीरनगरीत गुरुवारी वेगळय़ाच प्रकारामुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. घारीच्या पकडीतून निसटलेला साप विजेच्या तारेवर पडल्याने शॉर्टसíकटमुळे आग लागून उसाचा फड पेटला. दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सुमारे एक एकरातील उसाचे नुकसान झाले.
शिये गावाजवळ टोलवसुली नाका आहे. तेथे ठाणेकर कुटुंबीयांची शेती आहे. त्यांनी शेतामध्ये उसाची लावण केली आहे. गुरुवारी दुपारी या शेतावरून एक घार जात होती. तिच्या चोचीमध्ये साप वा मृत प्राण्याचे लांब आतडे होते. ते घारीच्या चोचीतून निसटले आणि ते थेट विजेच्या तारेवर पडले, यामुळे शॉर्टसíकट घडून विजेची तार तुटली. ही तार उसाच्या फडात पडली. यामुळे उसाला आग लागली. दुपारच्या कडक उन्हामुळे आग भडकत गेली. शेतामध्ये काम करणारे लोक, रस्त्यावरून जाणारे लोक यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ा आल्या. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत एक एकरातील ऊस जळाला होता.