सरकारी अधिकारी आणि लोकप्रियता हे समीकरण आपल्याकडे क्वचितच पाहायला मिळते. फार कमी अधिकारी जनतेच्या आणि तरुणांईच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यातीलच एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणजे कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील. वारणेच्या कुशीत वसलेल्या कोकरुड नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीनं त्यांच नाव या गावची एक नवी ओळख झाली आहे. उच्च अधिकारी पदावर पोहोचण्यासाठी ग्रामीण आणि शहर अशी सीमा नसते, त्यासाठी हवा असतो तो विश्वास हेच नांगरे पाटील यांनी दाखवून दिले. नांगरे- पाटील यांचे नाव घेतल्यावर आठवते ती २६/११ ची काळरात्र, पुण्यातील रेव्ह पार्टीतील धडक कारवाई आणि अहमदनगरमध्ये रात्री अपरात्री सायकलीवरुन फिरुन गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये निर्माण केलेली दहशत. प्रशासकीय सेवेतीली त्यांच्या या कामगिरीमुळे ते ज्या ग्रामीण भागतून आले त्या भागातील तरुणांमध्ये प्रशासकीय सेवेत जाण्याचा कल वाढल्याचे पाहायला मिळते. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली, केवळ त्या विद्यापीठातच नव्हे तर राज्यभरात स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते प्रेरणा स्थान आहेत. त्यांच्यातील धमक वेळोवेळी चमकदारी कामगिरीतून सिद्ध झाली आहे आणि होत राहिल. पण इतक्या धडाडीनं काम करत इतरांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीमत्वाला प्रेरणा कोणाकडून मिळत असेल? हा प्रश्न त्यांच्याविषयी जाणून घेणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच पडत असेल. विश्वास नागरे-पाटील यांच्या यशात सर्वात मोठे योगदान हे त्यांच्या कुटुंबियांचे आहे. कुटुंबियावर त्याचे अतोनात प्रेम तर आहेच. पण कुटुंबातील एक व्यक्ती त्यांच्यासाठी अगदी सर्वोच्च स्थानी आहे. ती म्हणजे त्यांचे वडील. वडिलांविषयीच्या प्रेमाबद्दलचे वर्णन कदाचित ते शब्दांत व्यक्त करु शकणार नाहीत. अनेकदा भाषणातून त्यांनी सुरुवातीच्या काळात वडिलांनी कुस्ती खेळण्यासाठी प्रवृत्त केल्याचे किस्से सांगितले आहेत. पण वडिलांबद्दलचे प्रेम त्यांनी ठळकपणे कधी व्यक्त केले नाही. याच कारण प्रेम हे व्यक्त करण्याची गोष्ट नाही, असा त्यांचा विश्वास असावा. अर्थात यशाच्या प्रवासात आणि यश मिळाल्यानंतर आपल्या पाठिशी खंबीर असणाऱ्या वडिलांच्या भावना कोमेजणार नाहीत याची प्रेरणा देखील त्यांच्याकडून मिळते. नांगरे -पाटलांना आदर्श स्थानी ठेवून कठोर मेहनत घेण्याचा निश्चय करणाऱ्या तरुणाईनं त्यांच्यातील हा गुण ही निश्चित जोपासावा. आज तरुणाई स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी गाव सोडून शहराकडे धावते. आपल्या मेहनतीसोबत आपल्यासोबत आपल्या कुटुंबिय देखील कष्ट घेत आहेत, याचे भान त्यांनी ठेवायला हवे. एवढेच नाही तर विश्वास नांगरे पाटलांसारखे यशानंतरही ते जपायला हवे.