किल्ल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच त्यांना जागतिक वारसा प्राप्त व्हावा यासाठी जागतिक वारसा समितीचे सदस्य आज पन्हाळगडाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. ही समिती पन्हाळगडासह राज्यातील पाच किल्ल्यांची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करणार आहे. ही समिती किल्ले विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड आणि शिवनेरी या पाच किल्ल्यांची पाहणी करणार आहे.
छत्रपती शिवरायांचा धगधगत्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले दुरुस्तीअभावी नामशेष होऊ पाहात आहेत. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा इतिहास या गडकोटांना आणि सागरी किल्ल्यांना असतानाही त्यांचे अस्तित्व सरकारी अनास्थेमुळे नष्ट होत आहे. त्यामुळे या किल्ल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच त्यांना जागतिक वारसा प्राप्त व्हावा यासाठी संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून जागतिक वारसा समितीचे सदस्य डॉ. शिखा जैन या किल्यांच्या पाहणीसाठी आजपासून राज्यात दाखल झाल्या आहेत.
कोल्हापुरातील पन्हाळा किल्ल्यापासून त्यांनी या पाहणीला सुरुवात केली. या पाहणीच्या अनुषंगाने सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची भेट आणि दुर्गप्रेमींसोबत बठक घेणार असल्याचेही डॉ. शिखा जैन यांनी सांगितले. या समितीने ऐतिहासिक किल्ले पन्हाळगडाला भेट दिली. तसेच छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचीही माहिती घेतली. कोल्हापूरला या किल्ल्याच्या माध्यमातून मोठा ऐतिहासिक वारसा लाभल्याचे गौरवोद्गारही या समितीने काढले. राज्य सरकारही गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असून केंद्र आणि संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे.