ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सोनेरी कामगिरी केली आणि ५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अपेक्षापूर्ती केली. कुमारांच्या सांघिक विभागात महाराष्ट्राने विजेतेपदाची कमाई केली.शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत अभिनव याच्याकडून अव्वल दर्जाची कामगिरी अपेक्षित होती. मात्र त्याला हे विजेतेपद मिळविताना झगडावे लागले. त्याने अंतिम फेरीत २०८ गुणांची नोंद केली. सेनादलाच्या सत्येंद्र सिंगने २०७.२ गुण नोंदवत रुपेरी कामगिरी केली. हरयाणाच्या संजीव रजपूतने १८५ गुणांसह कांस्यपदक मिळविले. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या गगन नारंग याने निराशा केली. त्याला येथे फक्त १४२.२ गुण नोंदवता आले. सांघिक विभागात सेनादलाने १८५७.५ गुणांसह विजेतेपद पटकाविले. पंजाब व हवाईदल यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. कुमार गटात सेनादलाच्या धर्मेद्रसिंग याने ६२०.५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. सत्यम चौहान (हवाईदल) याने रौप्यपदक मिळाले तर महाराष्ट्राच्या तेजस कार्ले याला कांस्यपदक मिळाले. तेजस याने प्रतीक बोरसे व वीरभद्र साळोखे यांच्या साथीत महाराष्ट्रास सांघिक विभागात विजेतेपद मिळवून दिले. त्यांनी १८४०.७ गुण नोंदविले. सेनादल व पंजाब यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. युवा विभागात तामिळनाडूच्या बी.मिथिलेश याने ६१२.९ गुणांसह सोनेरी यश मिळविले. ऋषभ शंकर (उत्तराखंड) व फत्तेहसिंह धिल्लाँ (पंजाब) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. सांघिक विभागात पंजाबला विजेतेपद तर महाराष्ट्रास उपविजेतेपद मिळाले. पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूलमध्ये सेनादलाने अजिंक्यपद मिळविताना १६८४ गुणांची नोंद केली. कुमारांमध्येही त्यांनीच हा मान मिळविला.