हेडनचा शास्त्रींना टोला
शंभर कसोटी खेळल्यानंतर क्रिकेटच्या भल्याचे काय आहे, याविषयी मला बोलण्याचा अधिकार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने व्यक्त केले. नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी रवी शास्त्री यांनी टीकाकारांचा समाचार घेतला होता. मात्र ही खेळपट्टी क्रिकेटचे नुकसान करणारी आहे, असे ठाम मत हेडनने व्यक्त केले. मी शंभर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. क्रिकेटच्या भल्याविषयी बोलण्यासाठी एवढा अनुभव पुरेसा आहे, असे त्याने पुढे सांगितले.
‘‘८० टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींची प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या देशातील खेळपट्टय़ा बघा आणि त्याची चिंता करा अशीच आहे. पण खेळापोटी असलेल्या प्रेमातून माझी भूमिका मांडली. विभिन्न स्वरूपाच्या खेळपट्टय़ा असणार, त्यांच्याशी जुळवून घेणे हेच कौशल्य आहे,’’ असे हेडनने सांगितले.