इनामाची चिंता नसल्याचे कबड्डीपटू अजय ठाकूरचे मत भारताला जगज्जेतेपद मिळवून दिल्यानंतर सरकारकडून किंवा अन्य कुणाकडून काय इनाम मिळेल, ही चिंता आम्हा खेळाडूंच्या मनात मुळीच नसते. कारण देशासाठी काही तरी केल्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटत असतो, असे मत भारताचा कबड्डीपटू अजय ठाकूरने व्यक्त केले. शनिवारी इराणविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात अजयने महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय संपूर्ण विश्वचषक स्पध्रेत चढायांचे सर्वाधिक ५४ गुण मिळवणारा अजय म्हणतो, ‘‘देशासाठी खेळल्याचा गर्व वाटतो. कारण करोडो देशवासी आपल्याला पाहात असतात, त्यांच्या आशाअपेक्षा आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांची पूर्तता करणे, ही नैतिक जबाबदारी असते.’’ तो पुढे म्हणाला, ‘‘खेळाडू आणि सैनिक या दोघांचा मी मनापासून आदर करतो. ते खऱ्या अर्थाने देशासाठी काहीतरी करतात. खेळाडू देशासाठी पदक आणतात, तर सैनिक देशासाठी लढतात, ही त्यांची वैशिष्टय़े. ते नेहमी अभिमानास्पद असे कार्य करतात.’’ भारताला विश्वविजेतेपद मिळवून देताना तू पराक्रम दाखवलास, याचे तुझ्या राज्यासाठी काय महत्त्व असेल आणि तुला काय इनाम मिळेल अशी अपेक्षा आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अजय म्हणाला, ‘‘हिमाचल प्रदेश हा पहाडी भाग आहे. तिथे मैदानांची वाणवा आहे आणि खेळाच्या प्रांतात हिमाचल मागासलेले आहे. आमच्या राज्यात हरयाणासारखा सन्मान होत नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेनंतर बऱ्याचशा राज्यांनी दोन ते पाच कोटी रुपयांची इनामे दिली. पण हिमाचलमध्ये २० लाख रुपये बक्षीस देण्यात आले होते. माझी त्याविषयी मुळीच तक्रार नाही, तर मी हिमाचलवासी असल्याचा अभिमान आहे.’’ ‘हिमाचल कुमार’ या टोपणनावाने ओळखले जाणारे छोटू राम हे हिमाचल प्रदेशमधील नावाजलेले मल्ल. भारताकडून कुस्ती खेळण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले होते, परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. पण त्यांचा मुलगा अजयने २००७ मध्ये १९व्या वर्षीच कबड्डीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून वडिलांच्या स्वप्नाची पूर्तता केली होती. जगज्जेतेपद जिंकल्यानंतर वडिलांशी संवाद झाला का, असे विचारले असता अजय म्हणाला, ‘‘वडिलांशी बोलणे झाले, ते अतिशय खुशीत होते. तू थोडा कमजोर झाला आहेस. आपण नवी म्हैस खरेदी केली आहे, ती खूप दूध देते असे त्यांनी सांगितले.’’ विश्वचषकातील सलामीच्याच लढतीत कोरियाकडून भारताने पराभव पत्करला होता. त्यानंतर संघातील खेळाडू खचले होते, त्या कटू स्मृती सांगताना अजय क्षणभर भावुक झाला. तो म्हणाला, ‘‘कोरियाविरुद्धच्या पराभवानंतर कोणत्याही खेळाडूला जेवण पचनी पडले नव्हते. हे दु:ख इतके जिव्हारी लागले होते की रात्री झोपसुद्धा लागली नाही. पहिल्याच लढतीत ज्या चुका झाल्या, त्या पुन्हा करणार नाही, हा निर्धार आम्ही केला आणि दुसऱ्या लढतीमधील शानदार कामगिरीनिशी विजयपथावर परतलो. ’’प्रो कबड्डीचा चौथा हंगाम तुझ्यासाठी फारसा समाधानकारक गेला नव्हता, तरी काही महिन्यांत आलेल्या विश्वचषकापर्यंत तंदुरुस्ती साधून तू उत्तम खेळलास, याविषयी अजय म्हणाला, ‘‘गुडघ्याच्या दुखापतीमुळे प्रो कबड्डीच्या चौथ्या हंगामातून माघार घेण्याचा मी विचार करीत होतो. परंतु संघाच्या हितासाठी मी खेळलो. मात्र प्रो कबड्डी संपताच मी सर्वात आधी वैद्यकीय तज्ज्ञांना गाठले. त्यांनी धावणे, तंदुरुस्तीचे व्यायाम, आदी मार्गदर्शन केले. मुंबईतील स्वप्निल हजारे यांच्यामुळे मला या दुखापतीवर मात करून सावरता आले. त्यांनी माझा आत्मविश्वाससुद्धा वाढवला.’’