इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील भारतीय क्रिकेट संघाच्या मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीच्या खराब कामगिरीबाबत अभिनेत्री अनुष्का शर्माला जबाबदार धरले जात आहे. या कसोटी मालिकेच्या कालखंडात अनुष्का विराटसोबत होती, याविषयीच्या चर्चा आता ऐरणीवर आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांच्या परवानगीमुळेच तिला इंग्लंड दौऱ्यावर विराटची सोबत करता आली, तर भारताचे संघव्यवस्थापक सुनील देव यांनी मात्र याबाबत आपली तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली होती. त्यानंतर विराट आणि अनुष्का लवकरच विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. मात्र विराट-अनुष्का लवकरच विवाह करीत आहे, या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, ही अफवा आहे, असे शनिवारी अनुष्काच्या नजीकच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी अनुष्का विराटसोबत गेली होती.