भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानावर आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. याचबरोबर कर्णधार कोहली हा क्षेत्ररक्षणातही तितकाच चपळ आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून मात केली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतासमोर ६ षटकांमध्ये ४८ धावांचं लक्ष्य होतं. पण याआधी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान विराट कोहलीने केलेल्या एका ‘थ्रो’ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ऑस्ट्रेलियाच्या डॅन ख्रिश्चनने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर एक जोरदार फटका खेळला. यावेळी पहिली धाव पूर्ण केल्यानंतर ख्रिश्चन दुसऱ्या धावेसाठी परत मागे फिरला. यावेळी लाँगऑनच्या जागेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोहलीने धोनीच्या दिशेने ‘थ्रो’ केला, चेंडू पकडण्यासाठी धोनी पुढे आला मात्र तोपर्यंत कोहलीने ‘थ्रो’ केलेला चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळला होता. कोहलीच्या या ‘बुलेट थ्रो’ने काहीकाळ धोनीही भांबावून गेला.

अवश्य वाचा – पहिल्या टी-२० सामन्यात ‘या’ ९ विक्रमांची नोंद

यानंतर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, ज्यानंतर डकवर्थ लुईस नियमांनूसार भारताला ६ षटकांमध्ये ४८ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकापर्यंत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने रोहित शर्माच्या विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण करत पहिला सामना आपल्या नावे केला.